पान-२---
NSK26H29569
गंगापूर रोड ः काही मिनिटांच्या विलंबामुळे संधी हुकलेल्या परीक्षार्थींसह त्यांच्या पालकांनी व्ही. एन. नाईक परीक्षा केंद्राबाहेर केलेली गर्दी.
---------------
दोन मिनिटांचा उशीर, अनेकांची हुकली संधी
विलंबासाठी खड्ड्यांचे कारण; एनडीए-सीडीएसला एक हजार २६२ परीक्षार्थींची दांडी
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १३ ः केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे रविवारी (ता. १३) आयोजित एनडीए-सीडीएस या परीक्षेदरम्यान काही परीक्षार्थ्यांना अवघ्या दोन मिनिटांच्या विलंबामुळे परीक्षेस मुकावे लागले. या परीक्षार्थींसह पालकांनी प्रवेश मिळविण्यासाठी विनंती केली, मात्र त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. दरम्यान, नाशिकमधून प्रविष्ट चार हजार ३७५ पैकी तब्बल एक हजार २६२ परीक्षार्थींनी दांडी मारली.
गंगापूर रस्त्यावरील व्ही. एन. नाईक महाविद्यालय येथील केंद्रावर हा प्रकार घडला. परीक्षार्थींच्या म्हणण्यानुसार, त्यांना पोहोचण्यासाठी अवघा दोन ते पाच मिनिटांचा उशीर झाला. शहरातील खराब व खड्डेमय रस्ते आणि पावसामुळे काही मिनिटांचा विलंब झाला; परंतु कार्यरत कर्मचाऱ्यांनी प्रवेश नाकारल्याची परीक्षार्थींची तक्रार होती. दरम्यान, काही काळ परीक्षार्थी व पालकांकडून प्रवेश मिळविण्यासाठी धडपड सुरू होती. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पहिल्या सत्रातील परीक्षा हुकलेल्या परीक्षार्थींपैकी काही जण हताश होऊन घरी परतले. काही परीक्षार्थी लांबून आले असल्याने, त्यांनी दुसऱ्या सत्रातील परीक्षेस उपस्थिती नोंदविली. दरम्यान, या केंद्रावर प्रविष्ट ३८४ पैकी १२३ परीक्षार्थी गैरहजर होते.
----
सकाळ सत्रात पंचवीसशे विद्यार्थी
सीडीएससाठी शहरातील तीन केंद्रांवर झालेल्या परीक्षेस सकाळ सत्रात ५४६ परीक्षार्थी उपस्थित होते, तर ३७७ परीक्षार्थींनी दांडी मारली. एनडीए परीक्षेसाठी दोन हजार ५६७ परीक्षार्थी हजर होते, तर ८८५ परीक्षार्थींनी दांडी मारली. तर पेपर क्रमांक दोनला दोन हजार ६११ परीक्षार्थी उपस्थित असताना, ८४१ परीक्षार्थी गैरहजर होते. नाईकच्या केंद्रावर पहिल्या पेपरला १२३ गैरहजर असताना, दुसऱ्या पेपरला गैरहजर उमेदवारांची संख्या ११२ होती.
-------
नियमांनुसार प्रवेश नाकारला
आयोगाच्या नियमावलीनुसार परीक्षा सुरू होण्याच्या नियोजित वेळेपूर्वी ३० मिनिटे आधी केंद्राचे प्रवेशद्वार बंद केले जाते. त्यानंतर कोणालाही प्रवेश देण्याचे अधिकार स्थानिक अधिकारी, कर्मचाऱ्यांना नाहीत. हा नियम देशभरात एकसमान लागू आहे. एका केंद्रावर काही परीक्षार्थी निर्धारित वेळेनंतर पोहोचल्याने त्यांना नियमानुसार प्रवेश नाकारण्यात आल्याचे स्पष्टीकरण जिल्हा प्रशासनाने दिले आहे. प्रवेशपत्रावर ही अट स्पष्ट नमूद होती तसेच केंद्रावर वेळोवेळी तशी उद्घोषणाही केली होती. परीक्षार्थींनी विलंबासाठी वाहतूक कोंडी व खड्ड्यांचे कारण दिले होते. मात्र, संबंधित केंद्राच्या परिसरात रस्त्याचे मोठे काम किंवा खोदकाम सुरू नसल्याने हे कारण वस्तुस्थितीला धरून नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. कोणत्याही केंद्रावर वेळेपूर्वी प्रवेशद्वार बंद केल्याची तक्रार नसल्याचेही प्रशासनाचे म्हणणे आहे.
---------
कोटः
खड्डेमय रस्ते, पावसामुळे परीक्षा केंद्रावर पोहोचण्यास उशीर झाला. इतर परीक्षा केंद्रांवर पावणेदहापर्यंत प्रवेश दिला जात होता; परंतु नाईक महाविद्यालय केंद्रावर आमची अडवणूक करण्यात आली. अनेक परीक्षार्थींची ही शेवटची संधी होती. त्यांच्या करिअरच्या झालेल्या नुकसानीची भरपाई कोण करेल, याचे उत्तर यंत्रणेने द्यावे.
-वेदिका पाटोळे, परीक्षार्थी
----
चांदवड येथून परीक्षेसाठी आलो होतो. केंद्रावर पोहोचण्यास अवघा दोन मिनिटांचा उशीर झाल्याने प्रवेश नाकारणे खेदजनक आहे. माझ्यासह इतर अनेक परीक्षार्थींचे नुकसान झाले असून, परीक्षा केंद्रावरील कर्मचारी, प्रशासनाकडून उचित प्रतिसाद मिळाला नाही.
-शुभम कोल्हे, परीक्षार्थी