घाटनांद्रा घाटातून जाणाऱ्या
बसेस पूर्वत सुरू कराव्यात
सकाळ वृत्तसेवा
निंभोरी (ता. पाचोरा), ता. १५ ः घाटनांद्रा घाटातून बस सेवा बंद झाल्याने मराठवाडा व खानदेशातील प्रवाशांची सध्या प्रचंड गैरसोय होत आहे. त्यामुळे घाटनांद्रा घाटातील बंद बस फेऱ्या त्वरीत सुरू कराव्यात, अशी मागणी खानदेशासह मराठवाड्यातील प्रवाशांमधून होत आहे.
खानदेशातील हद्दीपासून मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरला जाण्यासाठी सर्वांत कमी अंतराचा घाटनांद्रा घाटाचा रस्ता आहे. पाचोरा, भडगावसह मराठवाड्यातील सिल्लोड, सोयगाव, कन्नड आदी तालुक्यातील प्रवासी याच घाटातून प्रवास करतात. मागीलवर्षी सप्टेंबरमध्ये अचानक ढगफुटी झाल्याने सिल्लोड, सोयगाव व पाचोरा आगारातील बसेसच्या फेऱ्या बंद केल्या होत्या. त्यानंतर त्या पुन्हा सुरु न झाल्याने या भागातील प्रवाशांना तेव्हापासून खासगी वाहनाने प्रवास करावा लागत आहे. ज्यामुळे प्रवाशांना जास्त अंतराने प्रवास करण्यासह आर्थिक भुर्दंड देखील सोसावा लागत आहे. या समस्येकडे जिल्ह्यातील मंत्र्यांसह या भागातील आमदारांनी दुर्लक्ष केल्यामुळे प्रवाशांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. पूर्वी सोयगाव आगाराची संभाजीनगर बस सोयीची होत. ती व्हाया शेंदुर्णी, पाचोरा, मोंढाळे, सातगाव डोंगरी, तिडका, घाटनांद्रा, चिंचोली, नाचनवेल, अंधारीमार्गे असल्याने तिचा सर्वांना फायदा होत होता. या संदर्भात पाचोरा व सोयगाव आगारात विचारले असता, ‘घाट अंरूद आहे, बस चालवणे जिकरीचे जाते’, ‘बसेस कमी आहेत’, ‘बसेसचे वाहक, चालक सेवानिवृत्त झाले आहेत’ अशी उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने दखल घेऊन ही बससेवा पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी होत आहे.
-------------------
कोट
पाचोरा आगारात नुकत्याच नवीन बसेस दाखल झाल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात इतरत्र बस फेऱ्या वाढतील. शिवाय लांब पल्ल्याच्या बंद झालेल्या फेऱ्या देखील सुरू होतील.
- किशोर पाटील, आमदार ः पाचोरा
-----------------------पूर्ण