पान दोन ॲंकर (किल्पआर्ट वापरावे)
----------------
गौराईंच्या फराळ पदार्थांना यंदा महागाईची झळ
पदार्थानुसार ५० रूपयांची वाढ; घरगुती पदार्थांना मागणी
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता.१४: सोमवारी थाटामाटात गणरायाचे आगमन झाल्यानंतर आता घराघरात गौराईंच्या आगमनाचे वेध लागले आहेत. गुरूवारी (ता.१७) सोनपावलांनी येणाऱ्या गौराईंना फराळाच्या पदार्थांचा नैवेद्य म्हणून लाडू, चकली, चिवडा, अनारसे, करंजी यासारख्या नानाविध पदार्थ नैवेद्य म्हणून ठेवले जाते. यंदा मात्र हे पदार्थ बनविण्यासाठी लागणाऱ्या साहित्याच्या किंमती वाढल्याने आता तयार फराळाचे पदार्थ खरेदी करण्यासाठी जादाचे पैसे मोजावे लागणार आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेने फराळाच्या प्रकारानुसार प्रतिकिलो ५० ते १०० रूपयांनी वाढ झाली असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
एकीकडे गणपतीची लगबग आणि लगेचच आगमन होणाऱ्या गौराईंची तयारी करीत असताना सगळ्यांचा घरी सर्व पदार्थ बनविणे शक्य होत नाही.अशावेळी घरगुती पद्धतीने तयार पदार्थ बनवून देणाऱ्यांना प्राधान्य दिले जाते. गेल्या काही दिवसांपासून सुकामेवा, साखर, गूळ, तेल, खोबरे, दूध पर्यायाने तूप यासारख्या सर्वच पदार्थांच्या किंमतीत कमी अधिक फरकाने वाढ झाली आहे. त्यामुळे यंदाच्या गौराईंनिमित्त फराळाचे घरघुती पदार्थ बनवून घेताना सर्वांना जादा पैसे मोजावे लागणार आहे.
सध्याच्या घडीला गृहिणी असणाऱ्या अनेक महिला असे पदार्थ तयार करून देत असून त्यानिमित्ताने रोजगार उपलब्ध हाेत आहे.
यावेळी साखर, गूळ, तेल यासारख्या किराणा वस्तूंचे भाव वाढल्याने तयार फराळाच्या पदार्थांच्या किंमतीत वाढ केली आहे. पदार्थ तयार करून न ठेवता दोन ते तीन दिवस आधी ऑर्डर घेतली जाते. जेणेकरून ग्राहकांना ताजे पदार्थ मिळतात.
-स्मिता घोटीकर, श्री गृहउद्योग, इंदिरानगर
पदार्थ : दर (प्रतिकिलो)
चकली : ६००
शंकरपाळे (खारे) ४५०
शंकरपाळे (गोड) ५००
रवा बेसन लाडू : ६००
नारळपाक लाडू : ५००
बेसन लाडू (शुद्ध तुपातले) : ६५०
भाजके पोहे चिवडा : ४००
मका चिवडा : ४५०
तिखट शेव : ४५०
ओले खोबरे करंजी : २०
चिरोटे : ६००