धुळे : टुडे पान २ साठी...
--
फोटो क्रमांक : 29634
धुळे : रेऊ वाणी विज्ञान विहारतर्फे केले सभागृहात झालेल्या कार्यक्रमात बोलताना डॉ. मंदार म्हस्कर. शेजारी मान्यवर.
--
इतिहास म्हणजे जे घडले ते लिहिणे
--
डॉ. मंदार म्हस्कर : रेऊ वाणी विज्ञान विहारात कार्यक्रम
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. १४ : इतिहास म्हणजे जे घडले ते लिहिणे आणि आपण सर्व या महान भारतीय परंपरेचे धनी आहोत. प्रत्येकाने स्वतः सत्य पडताळून पाहिले पाहिजे, असा विचार मांडत डॉ. मंदार म्हस्कर यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी ‘वेदांपासून संत साहित्यापर्यंत भारतीय संस्कृतीचा ज्ञान प्रवास’ या विषयावर भाष्य केले.
रघुनाथ केले सभागृहात झालेल्या कार्यक्रमात डॉ. म्हस्कर बोलत होते. शालेय विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेबद्दल आकर्षण, अभिमान आणि तिचा वापर वाढविणे ही आजची मुख्य गरज आहे. हीच बाब लक्षात घेऊन का. स. वाणी स्मृती प्रतिष्ठान संचलित ‘रेऊ वाणी विज्ञान विहारा’तर्फे विविध उपक्रम राबविले जात आहेत. या कार्याची दखल घेत शासनाच्या मराठी भाषा विभागाने जिल्ह्यातील शंभर शाळांमध्ये मराठी भाषेचे विविध उपक्रम राबविण्यासाठी प्रशासकीय मान्यता दिली आहे. याच पार्श्वभूमीवर का. स. वाणी संस्थेच्या रघुनाथ केले सभागृहात नुकताच कार्यक्रम झाला. कार्यक्रमात प्रमुख वक्ते डॉ. म्हस्कर, डॉ. सुप्रिया पाटील आणि डॉ. आशिष पानट आदींसह मान्यवर उपस्थित होते. या विशेष कार्यक्रमाला धुळ्यातील विविध शाळांमधून शंभर विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.
डॉ. म्हस्कर यांनी वेद, वेदांग, उपनिषदे आणि पुराणांमुळे आपली संस्कृती प्रगत झाली असल्याचे सांगितले. तसेच, अथर्ववेदानुसार वाद, जल्प आणि वितंडा या संकल्पना स्पष्ट करून, मनुस्मृतीतील धैर्य, क्षमा, मनावर नियंत्रण, अस्तेय, इंद्रियनिग्रह, विवेक, सत्य आणि अक्रोध या जीवनमूल्यांवर त्यांनी प्रकाश टाकला. डॉ. सुप्रिया पाटील यांनी ‘पु. ल. देशपांडे यांच्या साहित्याची ओळख’ या विषयावर मार्गदर्शन केले. विनोद बुद्धी ही एक उन्नत भावना असून, प्रत्येक गोष्टीमध्ये एक चांगली गोष्ट लपलेली असते, अशा शब्दांत त्यांनी पु. ल. देशपांडे यांच्या साहित्यातील जीवनवेध मांडला. मराठी साहित्यातील या अजरामर व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू त्यांनी उलगडून दाखवले. डॉ. आशिष पानट यांनी मराठी भाषा संवर्धनाचे महत्त्व सांगितले.