गणरायाच्या आगमनाला वरुणराजाची हजेरी
पुढील चार दिवस जिल्ह्यात पावसाचा अंदाज
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १४ : शहर व परिसरात श्री गणेशाच्या आगमन सोहळ्याला वरुणराजानेही हजेरी लावली. हलक्या सरींनी वातावरण भारावून गेले असून, गणेशभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. हवामान विभागाने पुढील चार दिवस जिल्ह्यात रिमझिम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तविला आहे.
नाशिकमध्ये एकीकडे गणरायाच्या आगमनाची लगबग सुरू असताना दिवसभर ढगाळ वातावरण होते. अधूनमधून झालेल्या हलक्या सरींमुळे गणेशोत्सवाच्या उत्साहात आणखी भर पडली. मात्र, अचानक येणाऱ्या पावसामुळे छोट्या-मोठ्या विक्रेत्यांची काहीशी धावपळ उडाली. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही ठिकठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. गणरायाच्या आगमनासोबत वरुणराजाचे पुनरागमन झाल्याने सर्वत्र चैतन्याचे वातावरण आहे.
पावसाचा जोर कमी असला तरी धरणांमधील विसर्ग कायम आहे. गंगापूर धरणातून ३५६ क्युसेकने विसर्ग सुरू आहे. दारणाची दारे पुन्हा उघडण्यात आली असून, धरणातून ८०० क्युसेकने नदीपात्रात विसर्ग सुरू आहे. याशिवाय भावलीतून २०८, पालखेड ८७४, ओझरखेड २४, वाघाड ३७३, तिसगाव २०, पुणेगाव ६०, वालदेवी ६५, भाम ३३१, आळंदी ३०, काश्यपी १५० आणि नांदूरमध्यमेश्वर धरणातून ८०७ क्युसेकने विसर्ग सुरू आहे. दरम्यान, यंदा जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ६३७ मिलिमीटर पर्जन्याची नोंद झाली आहे.