NSK26H29669 : कविता मिस्तरी
---
NSK26H29670
जळगाव : एमआयडीसी पोलिस ठाण्यात एकत्र आलेल्या कविता यांच्या मैत्रिणी व गल्लीतील महिला.
-------------
जळगावच्या महिलेचा पद्मालयाच्या जंगलात खून
---
संशयिताला अटक; पोलिसांच्या दुर्लक्षाने मैत्रिणीचीच जंगल शोधमोहीम
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १४ : शहरातील मेहरुणच्या रेणुकानगरातील रहिवासी कविता अरुण मिस्तरी (वय ३८) ८ सप्टेंबरपासून बेपत्ता झाल्या होत्या. गल्लीतील त्या मैत्रिणींशी रात्री अकराला व्हीडीओ काॅलवर बोलली होती. पोलिसांत अपहरणाचा गुन्हा दाखल करूनही शोध लागत नव्हता, म्हणून मैत्रिणीने जंगलात जाऊन कविताचा शोध सुरू केल्यानंतर रविवारी (ता. १३) रात्री पद्मालयाच्या जंगलात मृतदेह आढळला. या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करून संशयिताला अटक झाली आहे.
कविता मिस्तरी मोलमजुरी करून उदनिर्वाह करीत होत्या. मंगळवारी त्या घरातून गेल्या. अचानक कविता कुठे गेल्या? त्यांच्या बहीण रेखा मिस्तरी व भाचा प्रसाद मिस्तरी शोध घेत होते. मात्र, कुठलीच माहिती कळत नसल्याने अखेर कुटुंबीयांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अपहरणाचा गुन्हा दाखल झाला. पोलिस नाईक दीपक महाजन तपास करीत होते.
कविता यांचे शेवटचे लोकेशन म्हसावद दाखवत होते. त्यानंतर संपर्कच होत नाही. शिवाय पोलिसांत तक्रार देऊनही सापडत नसल्याने गल्लीतील महिलांसह नातेवाईक तरुणांना घेत, वराडसीम, जळके, चिंचोली व म्हसावद-पद्मालयाच्या जंगलात कविताचा शोध सुरू केल्याचे त्यांची बहीण रेखा यांच्यासह महिलांनी सांगितले.
कविता नरेश ऊर्फ आबा सुरेश सोनवणे (वय ३५) यांच्यासोबत काही वर्षांपासून ‘लिव्ह ईन’मध्ये राहत होत्या. कविता यांना पहिल्या पतीपासून मुलगा व मुलगी आहे. घटनेच्या आदल्या दिवशी नरेशची आई व कविता यांच्यात भांडण झाले. त्याच भांडणाचा राग धरून ती बहिणीकडे आली होती.
दवाखान्याचे कारण करून नेले
नरेश दुचाकी घेऊन आला व कविताला दवाखान्यात घेऊन जाण्याचे सांगत सोबत घेऊन गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावर त्यांनी त्याचा शोध घेतला. मात्र, तोही बेपत्ता होता. त्याच्या घरी चौकशी केल्यावर त्याच्या आईने आम्हाला माहिती नाही, असे सांगत पोलिसांना रवाना केले. आठ दिवसांनंतर मृतदेह सापडल्यावर पुन्हा पोलिस त्याच्या घरी धडकले. त्याच्या आईला दरडवल्यावर तिने माझ्या मुलाने कविताचा खून केल्याची माहिती दिली. पोलिसांनी त्याचा कसून शोध सुरू केला.
कारण अस्पष्टच
कविताची बहीण रेखा मिस्तरी व भाचा प्रसाद मिस्तरी यांनी या प्रकरणातील संपूर्ण सत्य समोर आणण्याची मागणी करीत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, कविता यांच्या मृत्यूचे नेमके कारण काय? त्यांचा मृत्यू कोणत्या परिस्थितीत झाला व या घटनेमागे कोणाचा सहभाग आहे?, याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे.