ऋषी पंचमीनिमित्त नदीकाठावर गर्दी
---------
अनेकांचा उपवास; पुजा, अर्चना करीत सोडले व्रत
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १५ : भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या दिवशी गणेश पूजन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ऋषिपंचमी सर्वत्र साजरी केली जाते. ऋषीपंचमीच्या व्रतासाठी महिलांची लगबग होती. सप्तर्षींच्या स्मरणातून त्यांच्याप्रती आदर, कृतज्ञता व्यक्त करण्याच्या भावनेतून हे व्रत करतात. त्यानुसार महिलांनी मंगळवारी (ता.१५) व्रत करीत पहाटेच नदीवर जावून स्नान केले.
भारतीय संस्कृतीतील प्राचीन ऋषी-मुनींच्या ज्ञानपरंपरेचे स्मरण करण्याचा हा दिवस मानला जातो. या दिवशी कश्यप, अत्री, भारद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी व वसिष्ठ या सप्तर्षींसह अरुंधतीचे पूजन केले जाते. प्रामुख्याने गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी प्रामुख्याने ऋषीपंचमीचे व्रत महिला करतात.
आघाड्याच्या पानांनी स्नान
ऋषी पंचमीच्या व्रतात आघाड्याच्या पानांना विशेष महत्त्व आहे. महिलांकडून आघाड्याच्या सात पानांची जुडी तयार केली जाते. ही जुडी डोक्यावर ठेवून सात वेळा पाणी ओतून स्नान करण्याची परंपरा आहे. त्यानंतर नवीन अथवा कोरे कपडे परिधान करून व्रताचे आचरण केले जाते. यासाठी शहरातील मेहरुण तलाव, गिरणा नदी, तापी नदीवर पहाटेच्या सुमारास गर्दी झाली होती.
अन्न टाळण्याची प्रथा
ऋषिपंचमीच्या दिवशी महिला पारंपरिक पद्धतीने आहाराबाबतही विशेष नियम पाळतात. बैलाच्या श्रमातून तयार झालेले अर्थात शेतात बैलाच्या सहाय्याने उत्पादन घेतलेल्या धान्याचा वापर करीत नाहीत. अर्थात अन्न व गाईचे दूध न घेण्याची प्रथा अनेक महिला आजही पाळतात. परिस्थितीनुसार हे शक्य नसल्यास महिला उपवास करतात. उपवासानंतर फलाहार किंवा उपवासाचे पदार्थ ग्रहण करतात.