NSK26H29727
जळगाव : सेवा संकल्प अभियानाच्या पूर्वतयारीचा सोमवारी जिल्हास्तरीय आढावा घेताना जिल्हाधिकारी रोहन घुगे.
--------
उद्दिष्टकेंद्रीत नियोजनातून अभियान यशस्वीपणे राबवा
-----
जिल्हाधिकारी रोहन घुगे : जिल्ह्यातील सेवा संकल्प पूर्वतयारीचा घेतला आढावा
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता.१५ : सेवा संकल्प अभियानात लोककल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासोबतच महत्वाच्या उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करून सेवा संकल्प अभियान यशस्वीपणे राबवा, अशा सुचना जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी दिल्या.
जिल्ह्यात १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबरदरम्यान राबविण्यात येणाऱ्या ‘सेवा संकल्प अभियाना’च्या पूर्वतयारीसंदर्भात जिल्हास्तरीय आढावा बैठक जिल्हाधिकारी घुगे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी (ता.१५) झाली. त्यात ते बोलत होते.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर, प्रांताधिकारी योगेश कुमार मीना, अपर जिल्हाधिकारी श्रीमंत हारकर, विविध विभागांचे प्रमुख प्रत्यक्ष, तर सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी दूरदृश्यप्रणालीद्वारे बैठकीत सहभागी होते.
जिल्हाधिकारी घुगे म्हणाले की, या अभियानाची जिल्ह्यात प्रभावीपणे अमंलबजावणी करण्यासाठी प्रत्येक विभागाने आवश्यक नियोजन करावे व विशेष नावीन्यपूर्ण उपक्रम तालुकास्तरावर व शहरात प्रभावीपणे राबवावेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संविधानिक पदावरील कारकीर्दीला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने व त्यांच्या कार्यकाळातील ‘सेवा परमोधर्म’ या भावनेतून सामान्य नागरिकांपर्यंत विविध शासकीय सेवा पोहोचविण्याच्या उद्देशाने हे अभियान राबविण्यात येणार आहे.
----------
अभियानात होणारी कामे
या अभियानांतर्गत सेवा सेतू उपक्रमाद्वारे जिल्ह्यातील नागरिकांना विविध सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यात प्रलंबित फेरफार नोंदीचा निपटारा करणे, जीवंत सातबारा मोहीम, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेतंर्गत सिंचन विहिरीसाठी अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांची ऑनलाईन नोंदणी करणे, गावठाणातील नागरिकांना स्वामित्व सनद वाटप करणे, दिव्यांग प्रमाणपत्र देणे, मुख्यमंत्री बळीराजा शेतपाणंद रस्ते उपलब्ध करणे यांसारखे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यासाठी जिल्हा व तालुकास्तरीय अधिकाऱ्यांनी आवश्यक नियोजन करून प्रभावी अंमलबजावणी करावी, अशा सूचनाही जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिल्या.
विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा
शासकीय व खासगी शाळांत ‘विकसित भारत’ या संकल्पनेवर चित्रकला, ‘मुलांच्या स्वप्नातील भारत’ व ‘विकसित भारत-२०४७’ या विषयांवर वक्तृत्व स्पर्धा घेण्यात येणार आहे. त्यातील विजेत्या विद्यार्थ्यांना पुरस्कार देण्यात येतील.