‘त्या’ कचरा संकलनविरोधात
‘अभाविप’चे ठिय्या आंदोलन
----
उद्या महापालिकेची वाहने जाऊ देणार नाहीत
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १५ : गेल्या अनेक महिन्यांपासून येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या बाहेर महापालिकेकडून कचरा संकलन केला जात आहे. याविरोधात गेल्या काही दिवसांपासून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून पाठपुरावा सुरू आहे. मात्र, तरीदेखील महापालिका प्रशासनाकडून कचरा संकलन हटविण्याची कारवाईच होत नसल्याचे दिसून येत आहे. म्हणून याविरोधात अभाविपकडून येत्या गुरुवारी (ता.१७) ठिय्या आंदोलन केले जाणार असल्याची माहिती ‘अभाविप’चे प्रदेश मंत्री डॉ. वरुण नन्नवरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
येथील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यालयात मंगळवारी (ता.१५) आयोजित पत्रकार परिषदेला महानगर मंत्री आर्यन भालशंकर, सहमंत्री मनोज कुंभारे उपस्थित होते. श्री. नन्नवरे म्हणाले की, शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या बाहेर शहरातून गोळा करून आणलेला कचरा संकलन करण्याचे काम गेल्या काही महिन्यांपासून केले जात आहे. याच परिसरात शासकीय तंत्रनिकेतनच्या व मुलींचे आयटीआय आहे. या आवारात कचरा संकलन करण्याचे काम केले जात आहे. कचरा कुजल्याने निर्माण होणाऱ्या दुर्गंधीचा त्रास विद्यार्थ्यांना होत आहे. याबाबत महापालिका प्रशासनाकडे तीन महिन्यांपासून पाठपुरावा सुरू आहे. याबाबत महापौर, आयुक्त व अपर जिल्हाधिकारी यांना निवेदनेदेखील दिलेली आहेत. यावेळी लवकरच कचरा संकलनाचे ठिकाण हटविण्याबाबत महापौरांनी आश्वासन दिले होते. परंतु, अद्याप हे काम झालेले नाही. दरम्यान, सात दिवसांपूर्वीदेखील निवेदन दिले. यावेळी आंदोलनाबाबत भूमिका मांडली होती. त्यानुसार शुक्रवारी (ता.१७) सकाळी साडेनऊला ‘अभाविप’कडून ‘आयटीआय’च्या बाहेर ठिय्या आंदोलन केले जाणार आहे. याठिकाणी कचरा संकलनाच्या गाड्या येऊ देणार नाहीत. येथून गाड्यादेखील जावू देणार नाहीत. महापालिका प्रशासनाकडून जोपर्यंत निर्णय होत नाही, तोपर्यंत ठिय्या आंदोलन सुरूच राहणार असल्याचे श्री. नन्नवरे यांनी स्पष्ट केले.