शेतात जनावरे घातल्याच्या
वादातून दोन गटांत हाणामारी
हुणाखांबचा वावरनपाडा येथील घटना
सकाळ वृत्तसेवा
नंदुरबार, ता. १६ : शेतात जनावरे घातल्याच्या कारणावरून दोन गटांत वाद होऊन हाणामारी झाल्याची घटना अक्कलकुवा तालुक्यातील हुणाखांबचा वावरनपाडा येथे घडली. या प्रकरणी दोन्ही गटांनी मोलगी पोलिस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादी दाखल केल्या असून, एकूण आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नटवर नवा वसावे यांच्या फिर्यादीनुसार, त्यांच्या शेतातील तुरीच्या पिकात गुरे घातल्याच्या कारणावरून वाद झाला होता. हा वाद मिटविण्यासाठी पंच मंडळी बसली असताना तुरीच्या शेतात मुद्दाम गुरे का घातली, असा जाब संशयितांना विचारण्यात आला. त्याचा राग आल्याने संशयितांनी फिर्यादीच्या अंगावर धावून जात त्यांना व त्यांच्या वडिलांना हाताबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच लाकडी दांडक्याने मारून दुखापत केली. शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
या प्रकरणी वीरसिंग डुंबडा नाईक, बाऱ्या डुंबडा नाईक, रवि धर्मा नाईक आणि दिनेश धर्मा नाईक (सर्व रा. हुणाखांबचा वावरनपाडा) यांच्याविरुद्ध मोलगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, दिवालीबाई माकत्या नाईक यांनीही पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार, त्या गुरे चारण्यासाठी गेल्या असता ‘इकडे गुरेढोरे आणायची नाहीत,’ असे सांगून त्यांना शिवीगाळ करण्यात आली व मारहाण करण्याचा प्रयत्न झाला. याबाबत जाब विचारला असता त्यांनाही मारहाण करण्यात आली. त्यांचे नातेवाईक मदतीसाठी आले असता त्यांनाही मारहाण करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या फिर्यादीनुसार नटवर नवा वसावे, बोंडा नवा वसावे, सिपा नवा वसावे आणि नवा डेटका वसावे (सर्व रा. हुणाखांब वावरनपाडा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोलगी पोलिस तपास करीत आहेत.