‘नदीसंवर्धना’चा नाशिकमधून प्रारंभ
मंत्री महाजन : राज्यभरात अभियान राबविणार
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १६ : राज्यातील नद्यांचे संवर्धन आणि पुनरुज्जीवनासाठी महाराष्ट्र नदीसंवर्धन अभियान राबविण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिकमधून या अभियानाचा प्रारंभ करण्यात येईल, अशी माहिती जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी दिली.
मुंबई येथील मंत्रालयात मंत्री महाजन यांच्या अध्यक्षतेखाली नदी पुनरुज्जीवनाबाबत बैठक पार पडली. या वेळी जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह, सचिव एकनाथ डवले, डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, प्रकाश मिसाळ यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मंत्री महाजन म्हणाले, की महाराष्ट्र नदीसंवर्धन अभियानाचा प्रारंभ लवकरच संमेलनातून करण्यात येणार आहे. यादृष्टीने मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव मान्यतेसाठी सादर केला जाईल. सिंहस्थाच्या अनुषंगाने नाशिक येथे विशेष राज्यस्तरीय कार्यशाळा व कार्यक्रमही घेण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त सरकारने ‘चला जाणूया नदीला’ हे अभियान राबविले होते. या अभियानांतर्गत राज्यातील ३५ जिल्ह्यांमधील १०८ नद्यांचा अभ्यास करण्यात आला. नद्यांविषयी जनजागृती करण्यासह त्या अविरल, निर्मळ आणि प्रवाही करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांचाही अभ्यास करण्यात आला. स्थानिक नागरिक, विद्यार्थी, अभ्यासक, शास्त्रज्ञ व प्रशासकीय अधिकारी यांच्या सहभागातून लोकाभ्यास व कृती आराखडे तयार करण्यात आले आहेत. या आराखड्यांमध्ये सुचविलेल्या उपाययोजनांच्या आधारे जलसंपदा विभाग आणि सरकारचे अन्य संबंधित विभाग नदीसंवर्धनासाठी काम करणार असल्याचे महाजन यांनी सांगितले.
कोट
महाराष्ट्रातील नद्यांचे पुनरुज्जीवन आणि संवर्धन हा महत्त्वाचा विषय आहे. या पार्श्वभूमीवर विविध पातळ्यांवर सरकारकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. महाराष्ट्रात नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी या प्रयत्नांचा भाग म्हणून नाशिक येथे होणारा कार्यक्रम महत्त्वाचा ठरेल.
-डॉ. राजेंद्र सिंह, जलतज्ज्ञ