चित्रपट महामंडळाने उत्तर महाराष्ट्राला पुन्हा डावलले
निर्णयावर नाराजी; सभासदांचा निव्वळ मतांपुरता वापर
दीपिका वाघ : सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १६ : अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष मेघराज भोसले यांच्या समर्थ पॅनलला विजय मिळवून देण्यात उत्तर महाराष्ट्रातील सदस्यांचा खारीचा वाटा होता. निवडणुकीनंतर महामंडळाच्या नवीन कार्यकारिणीत नाशिक शहराला किमान स्वीकृत संचालकपदासाठी संधी मिळणे अपेक्षित असताना त्या जागी गेल्या कित्येक वर्षांपासून संचालकपदावर कार्यरत असलेल्या मुंबईच्या रत्नकांत जगताप व बालरंगभूमीच्या अध्यक्षा ॲड. नीलम शिर्के-सामंत यांना संधी देण्यात आली आहे. या निर्णयावर उत्तर महाराष्ट्रातील सभासदांमध्ये प्रचंड नाराजी असून, महामंडळाने केवळ मतांपुरता वापर केल्याचे ते आता उघड बोलू लागले आहेत.
तब्बल दहा वर्षांनंतर अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची २०२६-३१ करिता ७ जूनला निवडणूक झाली. निवडणुकीत सोलापूर व नाशिक दोन नवीन मतदान केंद्रे देण्यात आली होती. शिवाय या निवडणुकीसाठी उत्तर महाराष्ट्राचे प्रतिनिधत्व करण्यासाठी नाशिकमधून श्याम लोंढे यांनी कला दिग्दर्शन विभागातून अपक्षपदाचा अर्ज भरला होता; परंतु समर्थ पॅनलच्या वतीने भविष्यात उत्तर महाराष्ट्राला संधी देण्याचे कबूल करीत लोंढे यांना अर्ज माघारी घेण्याची तसेच पॅनलला पाठिंबा देण्याची विनंती करण्यात आली होती. त्यानुसार लोंढे यांनी अर्ज मागे घेतला होता. निवडणुकीत उत्तर महाराष्ट्रातील सभासदांनी समर्थ पॅनलला कौल देत पॅनलला दणदणीत विजय मिळवून दिला. त्यानंतर नाशिक शाखेच्या वतीने जुलैमध्ये स्वीकृत सदस्यपदासाठी श्याम लोंढे व नीलम शिर्के यांच्या नावाची शिफारस करण्यात आली होती. त्यासाठी शिर्के यांचे नाव आधीच निश्चित मानले जात होते. पण, मुंबईत नुकत्याच झालेल्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत रत्नकांत जगताप यांचीच पुन्हा एकदा स्वीकृत संचालकपदासाठी निवड करण्यात आली. आजवर पुणे, मुंबई, कोल्हापूर शहराचे वर्चस्व राहिलेल्या महामंडळाने पुन्हा एकदा उत्तर महाराष्ट्राला डावलले. महामंडळ आपला पूर्वीचा कारभार पुन्हा हाकत असल्याचे यावरून पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.
कोट
स्वीकृत संचालकपदासाठी महाराष्ट्राच्या विविध भागांतून अर्ज आले होते. भविष्यात घटनादुरुस्ती करून संचालक मंडळांची संख्या तसेच स्वीकृत संचालकाची संख्या वाढविण्यावर भर दिला जाणार आहे.
-मेघराज भोसले,
अध्यक्ष, अ.भा. मराठी चित्रपट महामंडळ, कोल्हापूर
चौकट
संधी मिळणे का गरजेचे?
भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांची चित्रनगरी म्हणून नाशिक शहराची ओळख आहे. नाशिकमध्ये फिल्मसिटी होणार आहे. अहिराणी, खानदेशी गाणी जगभर गाजत असताना शहराचे प्रतिनिधित्व करण्यासाठी महामंडळात अधिकृत पद मिळणे गरजेचे मानले जाते.