धुळे : टुडे पान १ साठी...
--
फोटो क्रमांक : 29793 - जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते
--
जिल्ह्यात आजपासून सेवा संकल्प अभियान
--
पंतप्रधान मोदी यांच्या कारकीर्दीच्या निमित्ताने महिनाभर विविध उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. १६ : शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या निर्णयानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संविधानिक पदावरील कारकीर्दीला २५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने जिल्ह्यात १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या कालावधीत ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येणार आहे. राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या मार्गदर्शनात हे अभियान पार पडणार असून याद्वारे केंद्र व राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ पात्र नागरिकांपर्यंत थेट पोहोचविण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी दिली.
अभियानांतर्गत प्रत्येक तालुकास्तरावर सेवा सेतू अभियान शिबिर होतील. या शिबिरांमध्ये आपले सरकार सेवा केंद्रांमार्फत अर्ज प्रक्रिया पूर्ण करून नागरिकांना तात्काळ लाभ दिला जाईल. तसेच, प्रत्येक तालुक्यात किमान एका ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर पार पडेल. या मोहिमेत प्रलंबित फेरफार नोंदी, जिवंत सातबारा, ८- अ नोंदी अद्ययावत करणे, गावठाण स्वामित्व सनद वाटप, मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते, शिधापत्रिका, नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र, वनहक्क दावे, मालमत्ता हस्तांतरण नोंद, नवीन नळ व घरगुती वीज जोडणी, दिव्यांग प्रमाणपत्र, विवाह नोंदणी, आधार कार्ड, जन्म-मृत्यू दाखले, शिकाऊ वाहनचालक परवाना, महिला बचत गट नोंदणी आणि ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्रांसह तब्बल २२ प्रकारच्या सेवा पुरविल्या जातील. वनहक्क दाव्यांबाबत सर्व स्तरांवर बैठका घेऊन मोहीम कालावधीत सर्व दावे मार्गी लावण्याचे नियोजन आहे.
-
स्पर्धांचे आयोजन
या अभियानाचे मुख्य आकर्षण असणारी ‘जल, जन आणि सेवा संकल्प यात्रा’ धुळे जिल्ह्यातून प्रवास करणार असून, याद्वारे एलईडी स्क्रीनवरून विकासकामांची माहिती दिली जाईल. विकसित भारत- २०४७ संकल्पनेवर आधारित शाळांमध्ये चित्रकला व वक्तृत्व स्पर्धा, अंगणवाडी उत्सव, लाभार्थ्यांच्या घरी आशीर्वादाचा दिवा प्रज्वलित करणे, ‘बदलाची गोष्ट’ यशोगाथांचे संकलन आणि दोन ऑक्टोबरला कलापथकांद्वारे नमो सेवागाथा यांसारखे नावीन्यपूर्ण उपक्रम राबवले जातील. १७ सप्टेंबरला सार्वजनिक ठिकाणी आभार आणि संकल्पाची रांगोळी साकारण्यात येईल.
-
जिल्हास्तरीय समितीद्वारे नियंत्रण
अभियानाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी विसपुते यांच्या अध्यक्षतेत जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. यामध्ये संबंधित महापालिका आयुक्त व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे सदस्य असून, जिल्हा माहिती व जनसंपर्क अधिकारी हे सदस्य सचिव म्हणून काम पाहत आहेत. अभियानातील उत्कृष्ट कामांचे व्हिडिओ, रिल्स व छायाचित्रे संकलित करून त्यांना प्रसारमाध्यमांतून प्रसिद्धी दिली जाईल.
-
१४-१
चौकट
१४-१
उपक्रमांची रेलचेल
या अभियानादरम्यान प्रत्येक गाव व नागरी वॉर्डात सेवा माझे योगदान उपक्रम राबवून स्वच्छता मोहिमा, रक्तदान शिबिरे, अनाथालय व वृद्धाश्रम भेटी, वृक्षारोपण, आरोग्य तपासणी, प्लास्टिकमुक्ती जागरूकता, आणि महिला व बाल आरोग्यासाठी विविध कार्यक्रम घेतले जातील. याशिवाय अवयवदान संकल्प, व्यसनमुक्ती, रस्ते सुरक्षा, जलसंधारण व सायबर सुरक्षेबाबतही जागृती केली जाईल. ग्रामीण भागासाठी गटविकास अधिकारी तर शहरांसाठी मुख्याधिकारी किंवा वॉर्ड अधिकारी नोडल अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळतील.
-