जिल्ह्यात महसूलचे कामकाज ठप्प
तलाठी संपाचा परिणाम; स्वाक्षरीचे यंत्र जमा
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १६ : तलाठ्यांच्या मागण्यांवर बुधवारी (ता. १६) सकारात्मक तोडगा न निघाल्याने संप कायम आहे. या वेळी जिल्ह्यातील पंंधराही तालुक्यांतील तलाठ्यांनी त्यांचे डिजिटल स्वाक्षरीचे यंत्र तहसील कार्यालयात जमा केले. संपामुळे महसूलचे कामकाज ठप्प पडले असून, नागरिकांचे हाल होत आहेत. दरम्यान, जिल्ह्यात गुरुवार (ता. १७)पासून सेवा पंधरवडा राबविण्यात येत असतानाच तलाठी संपावर ठाम असल्याने प्रशासन कोंडीत सापडले आहे.
इगतपुरी तालुक्यातील पाच तलाठी, तसेच एका मंडलाधिकाऱ्यावरील कारवाईविरोधात नाशिक जिल्हा तलाठी महासंघ आक्रमक झाला आहे. संबंधित कारवाई मागे घेताना इगतपुरी-त्र्यंबकेश्वरचे प्रांताधिकारी पवन दत्ता यांची बदली करावी, अशी महासंघाची मागणी आहे. या मागण्यांसाठी सोमवार (ता. १५)पासून तलाठ्यांनी कामबंद आंदोलनाचे हत्यार उपसले. परिणामी जिल्ह्यातील महसूलच्या कामकाजावर परिणाम झाला आहे. गावपातळीवर विविध दाखले, सातबारा फेरफार, पीककर्जासाठी शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर बोजा चढविणे अशी निरनिराळ्या प्रकारची कामे ठप्प झाली. परिणामी शेतकरी व जनतेचे हाल झाले असून, तलाठी कार्यालयातून रिकाम्या हाती त्यांना परतावे लागले.
राज्य सरकारतर्फे १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत सेवा पंधरवडा राबविण्यात येत आहे. या पंधरवड्यात आदिवासी वनपट्टेधारकांना सात-तीन १२-ई अंतर्गत सातबाऱ्यांचे वाटप केले जाणार आहे. तसेच जनतेची कामे मार्गी लावण्याचे उद्दिष्ट सरकारने दिले आहे. मात्र, पंधरवड्यावर तलाठी संपाचे सावट आहे. त्यामुळे तलाठ्यांनी संप मागे घ्यावा, यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे.
दोन तालुक्यांची आज बैठक
त्र्यंबकेश्वर व इगतपुरी तालुक्यातील महसूल कर्मचाऱ्यांनी गुरुवारी (ता. १७) बैठक बोलविली आहे. बैठकीत पुढील आंदोलनाच्या दृष्टीने दिशा ठरविली जाणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळते आहे. त्यामुळे या बैठकीकडे आता तलाठी महासंघासह महसूल प्रशासनाचे लक्ष लागून आहे.
तलाठी : ७१७
मंडलाधिकारी : १२१
-------------