NSK26H29819
जळगाव : ‘चला जाणूया नदीला’बाबत बैठकीत सूचना देताना डॉ. राजेंद्र सिंह. शेजारी जिल्हाधिकारी रोहन घुगे आदी.
---
राज्याच्या विकासात पाणी नियोजन कळीचा मुद्दा
डॉ. राजेंद्र सिंह : गिरणा नदी खोरे पुनरुज्जीवन प्रकल्पाला गती देण्यावर चर्चा
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १६ : राज्याच्या विकासात पाण्याचे नियोजन व कार्यक्षम वापर हा कळीचा मुद्दा असून, जलसंकटावर मात करण्यासाठी लोकसहभाग आणि जलसाक्षरता काळाची गरज आहे. राज्य शासनाच्या जलसाक्षरता व नदी संवर्धन उपक्रमाचे दूरगामी परिणाम दिसत आहेत. सर्वसामान्यांमध्ये जलविषयक जनजागृती झाल्याशिवाय जलसमस्या सुटणार नाही, असे प्रतिपादन डॉ. राजेंद्र सिंह यांनी केले.
गिरणा नदी खोरे पुनरुज्जीवन प्रकल्पाच्या पुढील वाटचालीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात ‘चला जाणूया नदीला’ यासंदर्भात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी रोहन घुगे अध्यक्षस्थानी होते. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर, उपवन संरक्षक सौरिश सहाय, अपर जिल्हाधिकारी श्रीमंत हारकर, उपजिल्हाधिकारी (रोहयो) मंजूषा घाटगे, राज्यस्तरीय समितीचे अशासकीय सदस्य नरेंद्र चौघ, गिरणा, भोनक, डोंगरी, तितूर, बेलगंगा, भराडी या नद्यांचे समन्यवयक विशाल सोनकुळ, सोगर धनाड, प्रणील चौधरी, तेजस पाटील, सविता राजपूत, शेखर निंबाळकर, प्रशांत गायकवाड, राजेंद्रसिंह पाटील, किरण पाटील, एकनाथ मातळकर, मिलिंद देवकर व अधिकारी उपस्थित होते.