‘त्या’ शिक्षण संस्थेबाबत गंभीर तक्रारी
शिक्षणमंत्री दादा भुसे : शिक्षकाच्या मृत्यूची एसआयटीमार्फत चौकशी सुरू
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १६ : मालेगावच्या शाळेतील शिक्षक बोरसे यांच्या मृत्यू प्रकरणाला कोणी राजकीय रंग देत असेल तर ते योग्य नाही. त्या संस्थेबाबत गंभीर स्वरूपाच्या तक्रारी माझ्याकडेही करण्यात आल्या असल्याचे राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी सांगत प्रथमच हिरेंच्या शिक्षण संस्थेविषयी थेट भाष्य केले.
मंत्री भुसे म्हणाले, शिक्षकाच्या मृत्यूच्या प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी सुरू असून, कायदा आपले काम करीत आहे. चौकशी पूर्ण झाल्यानंतर वस्तुस्थिती समोर येईल आणि त्यानुसार कारवाई केली जाईल, असेही मंत्री भुसे यांनी या वेळी स्पष्ट केले.
शिक्षणमंत्री भुसे नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. संबंधित शाळेची पटसंख्या सुमारे ७०० दाखविली जात असली, तरी प्रत्यक्षात केवळ १०० ते १२५ विद्यार्थी उपस्थित असतात. १५ ऑगस्ट रोजीला स्वातंत्र्य दिनाचा राष्ट्रीय उत्सव साजरा होत असताना घडलेल्या प्रकाराचीही चौकशी केली जात आहे. या शाळेत सुमारे ३० शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी असल्याचेही त्यांनी नमूद केले.
अधिकाऱ्यांच्या स्कॅन केलेल्या सह्या वापरून भरती केल्याचा, कर्मचारी भरती न करता शासनाचे अनुदान घेतल्याचा, तसेच काही कर्मचाऱ्यांच्या नावावर कर्ज काढल्याचा आरोपही करण्यात आला आहे. नोकरी लावण्याच्या आमिषाने अनेकांकडून पैसे घेतल्याच्या तक्रारी असल्याचे मंत्री भुसे यांनी सांगितले. या सर्व बाबींची चौकशी केली जात असून, प्रकरणात कोणत्याही प्रकारचे राजकारण नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मला जी जबाबदारी आणि खुर्ची दिली आहे तिचा अवमान होणार नाही, यासाठी मी प्रयत्न करीत आहे. नाशिक जिल्ह्यातही मी भेटी देऊ शकतो. यापूर्वी इतर राज्यांमध्ये ज्या पद्धतीने भेटी दिल्या, त्याच पद्धतीने येथेही वस्तुस्थिती जाणून घेतली जाईल, असे मंत्री भुसे यांनी सांगितले.
‘शालार्थ आयडी’अहवालानंतर कारवाई
शालार्थ आयडी प्रकरणाबाबत बोलताना मंत्री भुसे यांनी सांगितले, की या प्रकरणातील पहिली कारवाई नागपूरमध्ये झाली आहे. एसआयटीने प्राथमिक अहवाल सादर केला असून, ही चौकशी संपूर्ण महाराष्ट्रासाठी आहे. उत्तर महाराष्ट्रातील चौकशीची प्रक्रिया अद्याप सुरू व्हायची आहे. एसआयटीचा अंतिम अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यानुसार कारवाई करण्यात येईल, असेही मंत्री भुसे यांनी स्पष्ट केले.