टुडे एक सेकंड मेन
NSK26H29855 ( सूचना : हा फोटो मोठा वापरावा)
जळगाव : आयटीआयजवळील कचरा संकलन केंद्र हटविण्याच्या मागणीसाठी अभाविपच्या विद्यार्थ्यांचे सुरू असलेले आंदोलन.
---
NSK26H29854 (हा फोटो दीड-दोन कॉलमात क्राप लहान वापरावा)
आंदोलनकर्त्यांशी चर्चा करताना महापौर दीपमाला काळे, आयुक्त आदित्य जिवने, उपमहापौर मनोज चौधरी आदी.
----
‘आयटीआय’समोरील कचरा हटविण्यासाठी अभाविपचा ठिय्या
विद्यार्थ्यांचा संताप; ३० दिवसांत कचरा डेपो बंद करण्याचे महापौर-उपमहापौरांचे आश्वासन
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १७ : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या (आयटीआय) प्रवेशद्वारासमोरील कचरा संकलन केंद्र हटविण्याच्या मागणीसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (अभाविप) गुरुवारी विद्यार्थ्यांना सोबत घेत ठिय्या आंदोलन केले. सकाळी साडेनऊच्या सुमारास सुरू झालेले आंदोलन दुपारी एकपर्यंत सुरू होते. ‘स्वच्छ परिसर हा विद्यार्थ्यांचा अधिकार आहे’, ‘कचरा हटवा, आयटीआय वाचवा’ अशा घोषणा देत विद्यार्थ्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले.
आंदोलनामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. विद्यार्थ्यांनी विविध मागण्यांचे फलक हातात घेत महापालिका प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. ‘महापालिकेने एक तास येथे बसून दाखवा’, अशा घोषणांनीही परिसर दणाणून गेला. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची दखल घेत महापौर दीपमाला काळे, उपमहापौर मनोज चौधरी, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, आयुक्त आदित्य जीवने, अतिरिक्त आयुक्त शोभा बाविस्कर, उपायुक्त निर्मला गायकवाड, शहर अभियंता योगेश बोरोले आणि आरोग्य विभागाचे प्रभारी सहायक आयुक्त समीर बोरोले यांनी घटनास्थळी भेट देऊन विद्यार्थ्यांशी चर्चा केली.
कचरा डेपो बंद करण्याची मागणी
टीबी रुग्णालयाच्या जागेवर कचरा टाकण्यासाठी नवीन मोठ्या रॅम्पचे सुमारे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम दीड महिन्यात पूर्ण करून आयटीआयसमोरील कचरा संकलन केंद्र कायमस्वरूपी बंद करण्यात येईल, असे आयुक्त आदित्य जीवने यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. मात्र, विद्यार्थ्यांनी दीड महिन्याची मुदत मान्य करण्यास नकार देत प्रशासनाकडे १५ दिवसांची मुदत मागितली.
तर स्वतः आंदोलनाला बसणार
यानंतर महापौर दीपमाला काळे आणि उपमहापौर मनोज चौधरी यांनी विद्यार्थ्यांशी चर्चा केली. हा परिसर माझ्या प्रभागात येत असून, एका महिन्यात कचरा संकलन केंद्र बंद झाले नाही, तर आपण स्वतः विद्यार्थ्यांसोबत आंदोलनाला बसू, अशी ग्वाही महापौरांनी दिली. याबाबत लेखी आश्वासन देण्याची तयारीही त्यांनी दर्शविली.
चौकट
३० दिवसांचे आश्वासन
दरम्यान, आंदोलनस्थळी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस उपअधीक्षक नितीन गणापुरे आणि जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक शेवाळे यांच्या पथकाने बंदोबस्त ठेवला होता. प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या आश्वासनानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले. मात्र, ३० दिवसांत कचरा संकलन केंद्र बंद झाले नाही, तर ३१ व्या दिवशी हा कचरा थेट महापालिका कार्यालयात आणून टाकू, असा इशारा अभाविपने दिला. यावेळी प्रदेश मंत्री डॉ.वरुणराज नन्नवरे, महानगर मंत्री आर्यन भालशंकर, महानगर सहमंत्री मनोज कुंभार, ईश्वरी जोशी, स्नेहल महाजन, अमरसिंह राजपूत, वरद पंढरकर, अभाविपचे कार्यकर्ते व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.