मेनफिचर
शहर टुडे पान दोनसाठी
----------
NSK26H29893
जळगाव : विद्यापीठात आयोजित ‘चला जाणूया नदीला’ या चर्चासत्रात बोलताना राजेंद्र सिंह. शेजारी कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी, प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे, नरेंद्र चुघ, डॉ. प्रवीण महाले.
––––
नदी स्वच्छ, प्रवाही न ठेवल्यास विकासावर परिणाम
--------
जलपुरुष राजेंद्र सिंह : विद्यापीठात ‘चला जाणूया नदीला’ विषयावर चर्चासत्र
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १७ : पाण्याशिवाय जीवन शक्य नाही. २१व्या शतकातील मोठे आव्हान म्हणजे निसर्गाशी असलेले नाते पुन्हा प्रस्थापित करणे. नदी स्वच्छ व प्रवाही ठेवली नाही, तर आरोग्य, रोजगार, शिक्षण व समाजाच्या विकासावर परिणाम होईल, असे रेमन मॅग्सेसे पुरस्कार विजेते जलपुरुष राजेंद्र सिंह यांनी स्पष्ट केले.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजना कक्षातर्फे ‘चला जाणूया नदीला’ या विषयावर एकदिवसीय चर्चासत्राचे आयोजन गुरुवारी (ता.१७) विद्यापीठात करण्यात आले होते. त्यात ते बोलत होते. याप्रसंगी कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी, प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे, जलबिरादरीचे नरेंद्र चुघ, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. प्रवीण महाले उपस्थित होते.
राजेंद्र सिंह यांनी ‘नीर, नारी, नदी-नारायणी’ या मंत्राचे महत्त्व स्पष्ट करीत नदी म्हणजे केवळ वाहणारी जलधारा नसून, संपूर्ण जीवनव्यवस्थेचा आधार असल्याचे सांगितले. लोकसहभागातून देशातील २३ नद्या पुनर्जीवित करण्याचे काम झाल्याचे सांगत त्यांनी विद्यापीठातील विद्यार्थ्यांनीही नदी पुनरुज्जीवनाच्या कार्यात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले. गिरणा नदी परिसरात ‘वॉटर सेंच्युरी’ उभारण्यासाठी सुमारे ७० विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्यावा. राष्ट्रीय सेवा योजना व इतर विभागांतील विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे काम केल्यास नाल्याचे नदीत रूपांतर करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य घडू शकते, असेही त्यांनी सांगितले.
कुलगुरू प्रा. माहेश्वरी यांनी भविष्यात पाण्याच्या उपलब्धतेवरून संघर्ष निर्माण होण्याची शक्यता असून, शाश्वत जलस्रोतांची सद्यस्थिती गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यापीठाच्या माध्यमातून तिन्ही जिल्ह्यांतील प्रत्येकी एका नदीच्या पुनरुज्जीवनासाठी राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांच्या माध्यमातून प्रयत्न करण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. खेमराज पाटील यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. मनोज इंगोले यांनी आभार मानले.