‘सेवा संकल्प’मधून योजनांचा जागर
रांगोळीच्या माध्यमातून सामाजिक न्याय विभागाच्या योजनांचा संदेश
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता.१७ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनातील २५ वर्षांच्या सेवाकार्याच्या निमित्ताने आणि ‘सेवा परमोधर्म’ या विचारातून प्रेरणा घेऊन सामाजिक न्याय विभागातर्फे राज्यभर ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येत आहे. १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबरदरम्यान होणाऱ्या या अभियानातून विभागाच्या विविध योजना व उपक्रमांची माहिती वंचित घटकांपर्यंत पोहोचवून पात्र लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ देण्यात येणार आहे.
अभियानांतर्गत गुरुवारी (ता. १७) रांगोळीच्या माध्यमातून सामाजिक न्याय विभागाच्या योजना व सेवांचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आला. समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त माधव वाघ यांच्या उपस्थितीत उपक्रमाचे उद्घाटन झाले. यावेळी जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे योगेश पाटील, वित्त व लेखा विभागाचे सहायक संचालक निशांत पवार, समाज कल्याण अधिकारी अश्विनी मोरे, लेखाधिकारी सागर संत यांच्यासह अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
वाघ म्हणाले, ‘समाजातील वंचित, दुर्बल आणि गरजू घटकांपर्यंत शासनाच्या योजना व सेवा पोहोचविणे हे सामाजिक न्याय विभागाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. अभियानाच्या माध्यमातून योजनांची माहिती अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचवून पात्र लाभार्थ्यांना त्याचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील राहील.’
या अभियानासाठी सामाजिक न्याय विभागाचे मंत्री संजय शिरसाठ, प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे आणि समाज कल्याण विभागाच्या आयुक्त दीपा मुधोळ-मुंडे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.