सेकंड मेन
--
आयटीआयजवळील कचरा केंद्र स्थलांतरित होणार
पर्यायी केंद्राचे काम ८० टक्के पूर्ण; ‘अभाविप’च्या आंदोलनानंतर लेखी आश्वासन
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १८ : शासकीय आयटीआयच्या प्रवेशद्वारासमोरील कचरा हस्तांतरण केंद्र हटविण्याच्या मागणीसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (अभाविप) केलेल्या आंदोलनानंतर महापालिका प्रशासनाने आता या प्रश्नावर लेखी भूमिका स्पष्ट केली आहे. आयटीआयजवळील केंद्र तातडीने बंद करणे शक्य नसल्याचे सांगतानाच, टी.बी. सॅनिटोरियमच्या जागेवर उभारण्यात येत असलेले पर्यायी कचरा हस्तांतरण केंद्र पूर्ण झाल्यानंतर सध्याचे केंद्र स्थलांतरित करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले आहे.
महापालिकेने दिलेल्या पत्रानुसार, टीबी सॅनिटोरियम येथील नवीन केंद्राचे सुमारे ८० टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित कामासाठी ३० दिवसांचा कालावधी लागणार असल्याचे कंत्राटदाराने कळविले आहे. त्यामुळे पर्यायी केंद्राचे बांधकाम पूर्ण होईपर्यंत आयटीआयजवळील कचरा संकलन व हस्तांतरण केंद्र सुरू ठेवण्याची भूमिका प्रशासनाने मांडली आहे.
सत्ताधारी-प्रशासनाची भूमिकेवर लक्ष
गुरुवारी झालेल्या आंदोलनानंतर रात्री महापालिकेकडून लेखी आश्वासन आंदोलनकर्ते विद्यार्थी संघटनेला देण्यात आले. या आश्वासन पत्रावर महापौर दीपमाला काळे आणि महापालिका आयुक्त आदित्य जिवने यांच्या संयुक्त नावाने तयार करण्यात आले असून, या पत्रावर महापालिका आयुक्त आदित्य जीवने यांचीच स्वाक्षरी आहे. त्यामुळे दोन्ही स्तरांवरील प्रत्यक्ष कार्यवाहीकडे आता लक्ष लागून असणार आहे.
चौकट
...तर कंत्राटदारावर होणार कारवाई
कामात आणखी विलंब झाल्यास संबंधित कंत्राटदार तसेच प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार संस्थेवर आवश्यक कायदेशीर, प्रसंगी फौजदारी कारवाई करण्याचा इशाराही पत्रातून देण्यात आला आहे. केंद्र परिसरातील स्वच्छता अधिक प्रभावीपणे करण्याचे तसेच महामार्गालगत कचरा टाकणाऱ्या हातगाडीधारकांवर कारवाई करण्याचेही प्रशासनाने नमूद केले आहे. आयटीआय परिसरातील स्वच्छतेबाबत संस्थेला नोटीस देण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. त्यामुळे १७ सप्टेंबरच्या आंदोलनानंतर या प्रश्नावर प्रशासनाची पुढील ३० दिवसांतील कार्यवाही आता लक्षवेधी ठरणार आहे.