NSK26H29984
जळगाव : अत्यल्प पावसामुळे जळगाव जिल्हा कोरडा दुष्काळग्रस्त जाहीर करण्यासह अन्य मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांना देताना राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी- कार्यकर्ते.
------
जळगाव जिल्हा कोरडा दुष्काळग्रस्त जाहीर करावा
उपशीर्षक
पावसाची ओढ; राष्ट्रवादी (श.प.) पक्षाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १८ : जिल्ह्यातील अनेक भांगामध्ये पावसाअभावी जमिनीतील ओलावा कमी झाला असून खरीप पिकांची वाढ खुंटलेली आहे. प्रशासनाने केवळ कागदोपत्री आकडेवारीवर अवलंबून न राहता प्रत्यक्ष शेतशिवारात जाऊन पिकांची पाहणी व पंचनामे करणे अत्यंत आवश्यक आहे, त्यामुळे जिल्हा कोरडा दुष्काळग्रस्त जाहीर करावा, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने केली आहे.
पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी (ता.१८) जिल्हाधिकारी घुगे यांची भेट घेऊन त्यांना यासंदर्भात निवेदन दिले. शेतकऱ्यांनी बियाणे, खते औषधे व मशागतीसाठी मोठा खर्च केलेला असताना अपेक्षित उत्पादन मिळण्याची शक्यता कमी झाली आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असून जनावरांच्या चाऱ्यासोबतच पिण्याचा पाण्याचाही प्रश्न गंभीर बनत असल्याचे या निवेदनात नमूद आहे.
या वेळी जिल्हा अध्यक्ष प्रमोद पाटील, महानगर जिल्हा अध्यक्ष अशोक लाडवंजारी, दिलीप खोडपे, विकास पवार, वाय. एस. महाजन, एजाज मलिक, कल्पिता पाटील, सुनील माळी आदी उपस्थित होते.
-----
(चौकट)
अशा आहेत मागण्या
- जिल्हा कोरडा दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यासाठी शासनाकडे तातडीने प्रस्ताव पाठवावा
- जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची नुकसान भरपाई द्यावी
- पात्र शेतकऱ्यांना पीक विम्याची नुकसान भरपाई मिळण्यासाठी विमा कंपनीने तातडीने कार्यवाही करावी
- जनावरांच्या चाऱ्याची समस्या लक्षात घेऊन चारा उपलब्ध करून देण्यात यावा
- शेतकऱ्यांना शासनाकडून मिळणााऱ्या सर्व सवलती व योजनांचा लाभ तातडीने देण्यात यावा
- शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीचा लाभ प्रत्येक पात्र शेतकऱ्याला मिळावा
- शेतकऱ्यांच्या पाल्यांना शैक्षणिक शुल्क माफी व एसटी पास सवलत देण्यात यावी
- नियमित कर्मफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान तत्काळ द्यावे
--------