जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची पत्रकार परिषदेत माहिती

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची पत्रकार परिषदेत माहिती
Published on
वंचित घटकांना ‘सेवा पुरविण्याचा संकल्प’ जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची माहिती सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १९ : सेवा संकल्प अभियानातून समाजातील वंचित, दुर्बल आणि पात्र घटकांना शासनाच्या विविध योजना, सेवा व सुविधांचा लाभ मिळवून देण्यासाठी जिल्ह्यात विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे. एकही व्यक्ती या सेवांपासून वंचित राहू नये, यासाठी प्रत्येक गावात शिबिरांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली. जिल्हाधिकारी प्रसाद म्हणाले, सेवा संकल्प अभियानांतर्गत प्रत्येक ग्रामपंचायतीत ‘रस्ते अदालत’ आयोजित करण्यात येणार आहे. स्थानिक रस्त्यांशी संबंधित समस्या, प्रलंबित कामे व नागरिकांच्या अडचणी जाणून घेऊन त्यावर आवश्यक कार्यवाही करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री पाणंद रस्त्यांची माहिती नागरिकांना मिळावी यासाठी निराधार योजनेपासून वंचित असलेल्या पात्र लाभार्थ्यांचा शोध घेऊन त्यांचा योजनांमध्ये समावेश करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. विविध सात प्रकारच्या आजारांनी बाधित पात्र नागरिकांचा योजनांमध्ये नियमानुसार समावेश करण्यासोबतच मृत व्यक्तींची नावे लाभार्थी यादीतून वगळणे, दिव्यांग व अन्य वंचित घटकांचा पात्रतेनुसार समावेश करण्यासाठी कार्यवाही करण्यात येणार आहे. वन हक्क दावे, क्षेत्र दुरुस्ती तसेच घरकुलासाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देण्याबाबतही विशेष कार्यवाही केली जाणार आहे. गावातील कचऱ्याचे ब्लॅक स्पॉट निश्चित करून तेथे स्वच्छता व सौंदर्यीकरण करण्यात येणार असून, जलस्रोतांची स्वच्छता करण्यावरही भर देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
Marathi News Esakal
www.esakal.com