टुडे २ ॲंकर
NSK26H30027
जळगाव : भामरे कुटुंबाच्या घरी स्थापन करण्यात आलेले गणराज.
----
गणरायाच्या निमित्ताने पुन्हा जुळतो परिवाराचा स्नेहबंध
भामरे कुटुंबाची ६० वर्षांची परंपरा; पुणे, मुंबईत असलेली पुढची पिढी उत्सवासाठी एकत्र
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १९ : आजच्या धावपळीच्या जीवनात कुटुंबातील सदस्य वेगवेगळ्या शहरांत स्थायिक होणे ही बाब नवी राहिलेली नाही. मात्र, जळगावातील द्रौपदीनगर येथील भामरे कुटुंबाने या बदलातही कुटुंबातील स्नेह आणि गणेशोत्सवाची परंपरा जपली आहे. एकनाथ व सुमनबाई भामरे यांनी सुरू केलेली गणेशोत्सवाची परंपरा तब्बल ५० ते ६० वर्षांनंतरही तितक्याच उत्साहाने सुरू असून, गणरायाच्या आगमनानिमित्त कुटुंबातील सदस्य पुन्हा एकत्र येतात.
कैलासवासी एकनाथ व सुमनबाई भामरे यांनी घरी गणरायाची स्थापना करून या परंपरेची सुरुवात केली. त्यानंतर त्यांचे पुत्र आनंदा, सुनील आणि दिनानाथ भामरे यांनी ती पुढे नेली. तिन्ही भाऊ आजही एकत्रच राहतात. त्यांच्या पुढील पिढीतील काही सदस्य मात्र शिक्षण आणि नोकरीच्या निमित्ताने पुणे, मुंबईसह इतर ठिकाणी आहेत. वर्षभर आपापल्या कामात व्यस्त असलेले हे सदस्य गणेशोत्सवाच्या निमित्ताने आवर्जून जळगावात एकत्र येतात.
गणरायाचे उत्साहात आगामन
गेल्या सुमारे २० वर्षांपासून पुढील पिढीही गणेशोत्सवाच्या तयारीत उत्साहाने सहभागी होत आहे. गेल्या काही वर्षांपासून मुंबई येथून गणरायाची मूर्ती आणली जाते. दरवर्षी घरातील आरासही वेगळी करण्याची परंपरा आहे. यंदा प्राचीन मंदिराचा देखावा साकारण्यात आला आहे. गणरायाच्या आगमनासाठीही विशेष तयारी करण्यात आली. सुमारे ६० जणांच्या ढोलपथकाच्या गजरात आणि घोडाबग्गीतून गणरायाचे जल्लोषात आगमन करण्यात आले.
आठवणीने गजबजते घर
गणेशोत्सव हा भामरे परिवारासाठी केवळ पूजा-अर्चनेचा उत्सव राहिलेला नाही, तर वर्षभर वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या कुटुंबीयांना एकत्र आणणारा आनंदाचा क्षण ठरतो. दोन बहिणींची कुटुंबे, मुले, नातवंडे आणि नातेवाईकही या काळात आवर्जून सहभागी होतात. त्यामुळे गणेशोत्सवाच्या दिवसांत भामरे परिवाराचे घर माणसांनी आणि आठवणींनी गजबजून जाते.
कोट..
गणेशोत्सवामुळे वर्षातून एकदा सर्वजण एकत्र येतात. शिक्षण आणि नोकरीच्या निमित्ताने बाहेर असलेली मुलेही आवर्जून घरी येतात. आई-वडिलांनी सुरू केलेली ही परंपरा पुढच्या पिढी तेवढ्याच श्रध्देने ही परंपरा जपत आहे, हे पाहून आनंद होत आहे.
- दिनानाथ भामरे