30033
बांभोरी येथील पुल
बांभोरी पुलावरुन महिलेची नदीत उडी
सतरा तासानंतर मृतदेह शोधण्यात यश;
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता.१९ : बांभोरी पुलावरून नदीच्या पुराच्या पाण्यात उडी मारुन ३५ वर्षीय महिलेने आत्महत्या केली. जयश्री प्रकाश चौधरी (वय-३५,रा.भिकमचंदजैन नगर) असे मृत महिलेचे नाव आहे.
जळगाव शहरातील भिकमचंद जैन नगर येथील रहिवासी जयश्री प्रकाश चौधरी या महिलेने शुक्रवारी (ता.१८) सायंकाळी बांभोरी पुल गाठले. त्यानंतर कठड्यावर चढून खोलवर नदीच्या पात्रात झोकुन दिले. घडल्या प्रकाराची माहिती बांभोरी ग्रामस्थांना मिळाल्यावर गावातील पट्टीच्या पोहणाऱ्यांसह ग्रामस्थांनी नदीच्या दिशेने धाव घेतली.
नदीपात्रात महिलेने उडी घेतलेल्या ठिकाणावर काही पोहणाऱ्यांनी पाण्यात उतरुन त्या महिलेचा शोध सुरु केला. मात्र,अंधारामुळे शोधण्यात अडथळा आला. त्यातच नदीपात्रातून वेगाने वाहणारे पुराचे पाणी यामुळे महिलेचा शोध थांबविण्यात आला. शनिवारी (ता.१९) सकाळी पुन्हा ग्रामस्थांनी नदीपात्रात शेाध घेतला, मात्र जयश्री चौधरी यांचा ठावठिकाणा लागला नाही. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता उपमहापौर मनोज चौधरी यांनी अग्निशामक दलास पाचारण केले. मुख्य अग्निशमन अधिकारी अश्वजीत घरडे यांच्यासह पथक साहित्यासह दाखल झाले.
सकाळी ९.३० ला अग्निशामक दलाने शोध व बचाव कार्यास प्रारंभ केला. नदीपात्रात पुरामुळे वाढलेली पाण्याची पातळी आणि पाण्याचा वेग यामुळे नदीपात्राचा तळ गाठ्यात प्रचंड अडचणी येत होत्या. अखेर दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर सकाळी रवींद्र बोरसे यांना पुलाच्या पिलरच्या अगदी जवळ काहीतरी जाणवले. त्यांनी त्या दिशेने झेप घेतली. बिलायती हुकच्या साहाय्याने जयश्री चौधरी यांना पाण्यातून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर जयश्री चौधरी यांना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आला. तपासणीअंती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जयश्री चौधरी यांना मृत घोषित केले.
रेस्क्यू ऑपरेशनमध्ये देविदास सुरवाडे, प्रदीप धनगर, सौरभ चिकटे, सत्तार तडवी आणि चिराग वाघ यांचा सहभाग राहिला. तसेच वन्यजीव संरक्षण संस्थेच्या गणेश सपकाळे, रवी भोई, नीलेश कोळी, दिनेश सपकाळे, योगेश गालफाडे आणि हेमराज सपकाळे शोध पथकानेही अग्निशमन दलाच्या जवानांसोबत सहभाग घेतला. जळगाव तालुका पोलिस ठाण्यात याप्रकरणी नोंद करण्यात आली.