रविवार विशेष : एक शून्य शून्य
नरेश हाळणोर
--------------
पंकज भालेराव,
वरिष्ठ पोलिस निरीक्षक, मुंबई नाका वाहतूक शाखा, नाशिक
फोटो : H30022
--------------
जमिनीच्या वाटणीतील नाराजीने संपविले रक्ताचे नाते!
---------------
लीड
खेडभैरव (ता.इगतपरी) या वाड्या-पाड्यावरची घटना. जमिनीचे वाटेहिस्से झाल्यानंतर २१ वर्षाचा पुतण्या जमिनीच्या वाटणीतून नाराज होता. याच वादातून त्याने ३० जून २०१८ च्या सकाळी थेट ५५ वर्षांच्या चुलतीवर धारदार चाकूने वार करून खून केला. अचानक झालेल्या हल्ल्याने सून मदतीला धावली असता, तिच्यावरही त्याने सपासप चाकूने वार केले. तिच्या पाठीमागे आलेला अवघ्या सहा वर्षांच्या चिमुकल्याच्या गळ्यावर त्याने चाकू चालवला अन् धरून दगडावर आपटला. तिघांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेले. अवघ्या चार वर्षाचा यश जवळच उभा असताना त्याच्यावरही त्याने चाकूने वार केले. पण, दैव बलवत्तर होते, म्हणून तो वाचला. अन् तोच ठरला प्रत्यक्ष साक्षीदार.
---------------
खेडभैरव येथील तिहेरी खून खटल्याची नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी सुरू होती. या घटनेचा प्रत्यक्ष साक्षीदार असलेला आठ वर्षांचा यश (२०२२ मध्ये) याची साक्ष होती. न्या. श्रीमती एम. व्ही. भाटिया यांच्या दालनात खटल्याच्या सुनावणीला सुरुवात झाली. सरकार पक्षाने या खटल्यातील प्रत्यक्ष साक्षीदार असलेल्या यशला न्यायालयासमोर आणले. त्या चिमुकल्याला पाहून न्या. श्रीमती भाटिया यांनी विशेष जिल्हा सरकारी वकील अजय मिसर यांच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले. मिसर यांनीही ‘साक्षीदार’ एवढेच उद्गार काढले. खटल्याची कागदपत्रे न्या. श्रीमती भाटिया यांनी चाळले. त्यानंतर त्यांनी आई, आजी, भाऊ गमावून बसलेल्या चिमुरड्या यशला स्वत:जवळ बोलावले. हे पाहून न्यायदान कक्षातील सारेच अवाक झाले.
न्या. श्रीमती भाटिया यांनी यशला स्वत:जवळ बसविले.
- तुझे नाव काय...
- यश... यश गणेश चिमटे
- तुझी आई, मम्मी नाही आलेले का इथे...
- नाही...
- का नाही आले...
- ते देवाघरी गेलेत
- कसं काय.... काय झालं त्यांना
- येक्या काकानं त्यांना मारलं
- कोण येक्या काका...
- तो येक्या काका... त्यानेच मारलं
- (न्यायदान कक्षातील उपस्थितांकडे नजर फिरवत...) येथे आहे का तो येक्या काका
- हो.. आहे ना... (आरोपींच्या बाकावरील सचिन चिमटे उर्फ येक्या काका याच्याकडे यशने बोट दाखविले)... तो
सारे न्यायदान कक्ष स्तब्ध होते.
.....
३० जून २०१८ च्या सकाळी पंकज भालेराव हे घोटी पोलिस ठाण्यात असतानाच, फोन खणखणला. माळवाडीपासून काही अंतरावर असलेल्या खेडभैरव याठिकाणी दोन महिला अन् एका लहान मुलाचा खून झाल्याची माहिती मिळाली. भालेराव पथकासह घटनास्थळी पोहोचले असता, दोन महिला व एका सहा वर्षांच्या चिमुरडा यांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते. २१ वर्षीय सचिन गणपत चिमटे यानेच हे कृत्य केले होते. खुनानंतर पळून न जाता तो तेथेच होता. भालेराव यांनी त्याला ताब्यात घेतले. आरोपीला अटक झाली होती, मात्र त्याच्याविरोधात भरभक्कम साक्षी, पुरावे महत्त्वाचे होते. भालेराव यांनी तिहेरी खुनाचा अत्यंत बारकाईने तपास केला. साक्षी, पुरावे भरभक्कम करण्यासाठी कोणताही कसूर न ठेवता तपास केला. परिणामी, आरोपीला तिहेरी खुनाच्या गुन्ह्यात चार जन्मठेपेची शिक्षा जिल्हा न्यायालयाने ठोठावली.
.....
१६-१
नेमकं काय घडलं....
आरोपी सचिन चिमटे याचे वडील आणि चुलते असे सारे चार भावंडं. त्यांच्या वडिलोपार्जित जमिनीचे हिस्सेवाटे करण्यात आले. यात सचिनच्या वाट्याला आलेल्या जमिनीवरून तो नाराज होता. चुलती हिराबाई शंकर चिमटे (५५) हिने त्याची समजूतही घातली होती. परंतु तरीही त्याच्या डोक्यात तो रागच होता. ३० जून २०१८ च्या सकाळी साडेनऊ-दहाच्या सुमारास चुलती हिराबाई घराबाहेर बसलेली असताना सचिनने हातात लाकडी दांडका अन् चाकू घेतला. रागाने लाल झालेल्या सचिनने चुलती हिराबाईच्या डोक्यात दांडक्याने एकापाठोपाठ एक दणके दिल्याने ती जागीच गतप्राण झाली. अचानक झालेला प्रकार पाहून हिराबाईची सून मंगलबाई गणेश चिमटे (३०) ही सासू हिराबाईच्या दिशेने धावली असता, सचिनने तिच्यावरही चाकूने वार केले. गळ्यावरच चाकूचा वार झाल्याने तीही जागेवर कोसळली. अवघ्या सहा वर्षांचा रोहित गणेश चिमटे आई मंगलाबाईच्या मागे धावत आल्याने तोही सचिनच्या तावडीत सापडला. त्याने चिमुकल्यालाही सोडले नाही. त्याने रोहितच्या गळ्यावर चाकूने वार केला आणि त्याला उचलून खडकावर आपटले. तिघेजण रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्यानंतर तो चुलत्याच्या घराकडे चालू लागला असता, मंगलाबाईचा तीन-चार वर्षांचा दुसरा मुलगा यश याच्यावरही त्याने चाकूने वार केले. त्याचवेळी आरोपी सचिनची बहीण, आसपासचे नातलग, नागरिक धावून आल्याने त्यांनी सचिनला आवरले. पण तोपर्यंत तिघांचा बळी त्याने घेतले होते. गंभीर जखमी यशला तातडीने इगतपुरीला रुग्णालयात हलविण्यात आले. घटनेची माहिती घोटी पोलिस ठाण्याला कळविण्यात आली.
....
१६-२
भरभक्कम पुरावे अन् साक्षीदार...
तिहेरी खुनाच्या घटनेने घोटीच नव्हे तर सारा जिल्हा हादरला होता. घोटीचे तत्कालीन प्रभारी अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक पंकज भालेराव तिहेरी खुनाचे दृश्य पाहून हादरलेच. आरोपीला अटक झाली होती, त्यांनी घटनास्थळी असलेल्या प्रत्यक्ष साक्षीदारांची माहिती घेतली. विशेषतः यात आरोपी सचिनची बहिण आणि या हल्ल्यात सुदैवाने बचावलेला चिमुरड्या यशची साक्ष महत्त्वाची होती. याप्रमाणेच, फॉरेन्सिक पुरावेही महत्त्वाचे होते. त्यादृष्टीने भालेराव यांनी बारकाईने तपास सुरू केला. अगदी घटनास्थळी स्वत: जाऊन बारकाईने पाहणी करीत प्रत्यक्ष पुरावा संकलित केला. गुन्ह्यात वापरण्यात आलेला लाकडी दांडका, चाकू जप्त केला. त्याच्या अंगावरील कपडे आणि मृत झालेल्यांच्या रक्ताच्या नमुन्यांसह घटनास्थळावरील रक्ताचे नमुनेही त्यांनी घेतले आणि ते फॉरेन्सिककडे पाठवून त्यांचे अहवाल घेतले.
.....
१६-२
तिहेरी खून, चार जन्मठेप
चुलती, चुलत वहिनी आणि पुतण्याचा निर्घृणपणे खून, पुतण्याला जीवे मारण्याचा प्रयत्न या गंभीर कलमांसह आरोपी सचिनवर गुन्हा दाखल करण्यात आला. तपासी अधिकारी सहायक निरीक्षक पंकज भालेराव यांनी ९० दिवसांच्या आत बारकाईने तपास करीत दोषारोपपत्र दाखल केले. यासाठी त्यांना हवालदार शीतल गायकवाड, पारधी, दोंदे, मथुरे, कासार यांची मदत झाली. या खटल्यासाठी सरकार पक्षातर्फे विशेष जिल्हा सरकारी वकील अजय मिसर यांनी प्रभावी युक्तिवाद केला. तत्कालीन जिल्हा व सत्र न्यायालयाच्या न्या. श्रीमती एम.व्ही. भाटिया यांनी प्रत्यक्ष साक्षीदार, पुराव्यांच्या आधारे आरोपी सचिनला तिहेरी खुनात चार जन्मठेपेची आणि तीन लाखांच्या दंडाची शिक्षा सुनावली होती.
....
१६-१
खाकीतील संवेदनशील माणूस
तपासी अधिकारी पंकज भालेराव हे न्यायालयात प्रत्यक्ष साक्षीसाठी हजर झाले होते, त्यावेळी जिल्हा सरकारी वकील अजय मिसर यांनी घटना विशद करण्यास सांगितले. भालेराव यांना त्यावेळी घटना सांगताना गहिवरून आले. एवढेच नव्हे तर त्यांच्या डोळ्यात पाणीही आले होते. ते पाहून मिसर यांनी, घटनेची भीषणता न्यायालयाच्या निदर्शनास आणून देताना भालेराव यांना शांत केले. पण त्यांनी सांगितलेल्या घटनेने मात्र न्यायदान कक्षातील प्रत्येकाच्या अंगावर शहारे (काटा) आले होते.
-----------
घोटी पोलिस ठाण्याचे तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक पंकज भालेराव यांनी तिहेरी खुनाचा अत्यंत बारकाईने तपास केला. आरोपीला तात्काळ अटक केली. साक्षी, पुरावे भरभक्कम करण्यासाठी भालेराव यांनी कोणतीही कसूर न ठेवता गुन्ह्याचा तपास केला. परिणामी, आरोपीला तिहेरी खुनाच्या गुन्ह्यात चार जन्मठेपेची शिक्षा जिल्हा न्यायालयाने ठोठावली.
.......................