धुळे ः टुडे १ साठी............मेन
--
तडजोडपात्र प्रकरणे निकाली निघणार
-
प्रविण कुळकर्णी : ‘राष्ट्रासाठी मध्यस्थी ३.०’ विशेष मोहीम
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. १९ : जिल्ह्यातील न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेली तडजोडीस पात्र प्रकरणे मध्यस्थीच्या माध्यमातून सामंजस्याने निकाली काढण्यासाठी ‘राष्ट्रासाठी मध्यस्थी ३.०’ ही विशेष मध्यस्थी मोहीम एक ऑक्टोबरपासून ९० दिवसांसाठी राबविण्यात येणार आहे. संबंधित पक्षकारांनी या विशेष मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव प्रविण एन. कुळकर्णी यांनी केले आहे.
ते म्हणाले, की सर्वोच्च न्यायालय तसेच राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या मार्गदर्शनात ही विशेष मध्यस्थी मोहीम राबविण्यात येत आहे. मध्यस्थी आणि सामंजस्य प्रकल्प समिती, राज्य विधी सेवा प्राधिकरण तसेच मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार जिल्हा व तालुका न्यायालयांमध्ये जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. भीष्म यांच्या मार्गदर्शनात ही मोहीम राबविण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेल्या आणि तडजोडीस पात्र ठरणाऱ्या प्रकरणांना या विशेष मोहिमेत मध्यस्थी प्रक्रियेसाठी घेण्यात येणार आहे. ज्या पक्षकारांची प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत आणि ती परस्पर सामंजस्याने मिटविण्याची त्यांची इच्छा आहे, अशा पक्षकारांना या मोहिमेचा लाभ घेता येईल. मध्यस्थी प्रक्रियेत संबंधित पक्षकारांना प्रत्यक्ष अथवा आभासी पद्धतीने सहभागी होता येणार आहे. इच्छुक पक्षकारांनी जिल्हा न्यायालय, संबंधित तालुका न्यायालय अथवा न्यायालयाच्या आवारातील येथील जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाशी संपर्क साधावा, असे आवाहन आहे. न्यायालयांमध्ये अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली तडजोडपात्र प्रकरणे मध्यस्थीच्या माध्यमातून निकाली काढल्यास पक्षकारांचा वेळ, पैसा व श्रमाची बचत होण्यास मदत होते. तसेच परस्पर सामंजस्यातून सुलभ व जलद न्याय मिळण्याचा मार्गही सुकर होतो, असे श्री. कुलकर्णी यांनी नमूद केले.