धुळे : टुडे पान २ साठी... मेन
--
फोटो क्रमांक : 30098, 30100
धुळे : गणेशोत्सवानिमित्त राणा प्रताप मंडळातर्फे सामाजिक विषयांवर कलात्मक सादरीकरणातून प्रबोधन करताना कलाकार. दुसऱ्या छायाचित्रात देखावा पाहण्यासाठी झालेली गर्दी.
--
‘भारत २०२६’ संकल्पनेतून राष्ट्रनिर्मितीचा संदेश
--
धुळ्यात राणा प्रताप मंडळाचा गणेशोत्सवात सामाजिक प्रबोधनाचा अनोखा उपक्रम
--
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. २० : येथील गल्ली क्रमांक सहामधील राणा प्रताप मंडळ यांच्या वतीने यंदाचा गणेशोत्सव भक्तिभाव, उत्साह आणि सामाजिक प्रबोधनाच्या संगमातून साजरा होत आहे. ‘गणराया म्हणतो… जागा हो भारत!’ या संकल्पनेतून लोककला, संवाद, पोवाडा, भारूड आणि जोगव्याच्या माध्यमातून देशासमोरील विविध ज्वलंत प्रश्नांवर भाष्य करण्यात येत आहे.
-
या देखाव्यातून जागतिक युद्धाचे मानवी, सामाजिक आणि आर्थिक दुष्परिणाम अधोरेखित करून शांतता व सहकार्याचे महत्त्व पटवून देण्यात आले आहे. अन्नभेसळ, दूध, पनीर, मावा, खाद्यतेल, मिरची आणि मसाल्यांमधील भेसळ तसेच नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या विक्रेत्यांवर कठोर कारवाईची गरज याबाबत जनजागृती करण्यात येत आहे. महापालिकेतील खड्डे, खराब रस्ते, अपघातांचा धोका आणि दुरुस्तीतील विलंब याकडेही लक्ष वेधण्यात आले आहे. नीट पेपरफुटी, बेरोजगारी, शिक्षण व्यवस्था, स्पर्धा परीक्षा, शेतकऱ्यांचे प्रश्न, वाढती महागाई, महिला सुरक्षा, पर्यावरण संवर्धन आणि नागरिकांची सामाजिक जबाबदारी या विषयांवर कलात्मक सादरीकरणातून प्रबोधन करण्यात येत आहे.
-
विद्यार्थ्यांचे प्रश्न अधोरेखित
‘मेहनतीला न्याय, विद्यार्थ्यांना पारदर्शक परीक्षा आणि युवकांना रोजगाराची संधी’ हा उपक्रमाचा प्रमुख संदेश आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अपेक्षा आणि अडचणी मांडताना विशेष सवलतीपेक्षा प्रामाणिक स्पर्धा, पारदर्शक परीक्षा आणि मेहनतीचा सन्मान मिळावा, अशी भूमिका मांडण्यात आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमध्ये संविधानातील समानता, समान संधी, सामाजिक न्याय, पारदर्शकता आणि गुणवत्तेचा आदर या मूल्यांचे पालन व्हावे, असा संदेश देण्यात आला आहे. शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च, शेतमालाला मिळणारे बाजारमूल्य, वाढती महागाई आणि सामान्य कुटुंबांवरील आर्थिक ताण याकडेही लक्ष वेधण्यात आले आहे. गणेशोत्सव केवळ धार्मिक उत्सव न राहता समाजजागृती आणि राष्ट्रनिर्मितीचे प्रभावी माध्यम ठरावे, या उद्देशाने मंडळाने हा उपक्रम साकारला आहे. या सादरीकरणासाठी कलाकार जितू नगराळे व त्यांची संपूर्ण टीम कार्यरत आहे. ध्वनी मुद्रणाची जबाबदारी ऋषिकेश चव्हाण, मंडप सजावटीची व्यवस्था निलेश पाटील आणि प्रकाश योजनेची जबाबदारी कैलास चौधरी यांनी सांभाळली आहे. अनिकेत तारगे मंडळाचे अध्यक्ष असून, सर्व सहकारी नियोजन करत असल्याची माहिती अनिल मुंदडा यांनी दिली.
-
१४-१
..चौकट..
१४-१
सामाजिक परिवर्तनाचा संदेश
शिक्षणातील मूलभूत सुविधा, सरकारी शाळांची स्थिती, खासगी शिक्षणाचा वाढता खर्च तसेच महिला सुरक्षा, सन्मान, शिक्षण आणि रोजगारातील समान संधी हे विषयही या देखाव्यातून मांडले गेले आहेत. या उपक्रमातील ‘भारत २०२६- गणराया, आम्हाला असा भारत दे!’ हा भाग विशेष लक्षवेधी ठरत आहे. ‘सोन्याचा भारत नको… ज्ञानाचा भारत मागा; सत्तेचा भारत नको… सत्याचा भारत मागा; स्वार्थाचा भारत नको… सेवेचा भारत मागा’ या संदेशातून सामाजिक परिवर्तनासाठी प्रत्येक नागरिकाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
-