(सेकंड मेन)
NYA26B01540
न्याहळोद : ग्रामपंचायत मंगल कार्यालयातील ग्रामसभेत विविध विषयांवर चर्चा करताना ग्रामस्थ. (छायाचित्र : विशाल रायते)
-
घरकुल योजनेतील पात्र लाभार्थी वगळल्याने रोष
-
न्याहळोद ग्रामसभा; अवैध रेती उपसा, अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीवर ग्रामस्थ आक्रमक
सकाळ वृत्तसेवा
न्याहळोद, ता. ५ : स्वातंत्र्यदिनानिमित्त प्रलंबित राहिलेली ग्रामपंचायत न्याहळोद (ता. धुळे) ग्रामसभा ग्रामपंचायत मंगल कार्यालयात सरपंच कविता वाघ यांच्या अध्यक्षतेत पार पडली. घरकुल योजनेतील पात्र व अपात्र लाभार्थ्यांच्या यादीतील फेरफार, अवैध रेती उपसा, शेती अतिक्रमण आणि शासकीय अधिकाऱ्यांच्या अनास्थेमुळे ही ग्रामसभा प्रचंड वादळी ठरली. पोलिसांच्या चोख बंदोबस्तात ही सभा झाली.
सभेत ग्रामसेवक संपावर असल्यामुळे उपस्थित नव्हते. ग्रामपंचायतीचे लिपिक बापू माळी यांनी घरकुल योजनेतील पात्र व अपात्र लाभार्थ्यांची यादी वाचून दाखवली. ही यादी वाचताच राजबाई कोळी, प्रमिलाबाई जाधव आणि इतर ग्रामस्थांनी पात्र असूनही घरकुल योजनेतून डावलल्याचा व काही अपात्र व्यक्तींना लाभ दिल्याचा आरोप केला. यामुळे सभेच्या सुरुवातीलाच गोंधळ उडाला. ग्रामसेवक गैरहजर असताना सभा कशी घेण्यात आली असा सवाल करत गटप्रमुख प्रकाश वाघ यांच्या उपस्थितीत ग्रामस्थांनी नव्याने ग्रामसभा घेण्याची जोरदार मागणी केली.
-
प्रश्नांचा भडिमार
सभेत ग्रामस्थांनी विविध समस्या मांडल्या. यामध्ये जीवन जिरे यांनी पाझरा परिसरात दिवस-रात्र आणि पहाटेच्या सुमारास सुरू असलेल्या अवैध रेती वाहतुकीमुळे शासनाच्या महसुलाचे नुकसान होत असून पर्यावरण धोक्यात आल्याची तक्रार केली. तसेच, नामदेव रोकडे यांनी, मंडळाधिकारी, कृषी सहाय्यक, पशुवैद्यकीय अधिकारी, इतर खात्यांचे कर्मचारी ग्रामसभेला गैरहजर राहिल्याने नागरिकांच्या समस्या मांडायच्या कोणाकडे, असा सवाल उपस्थित केला. माजी उपसरपंच देविदास जिरे यांनी त्यांच्या शेती अतिक्रमणाचा निकाल प्रांत अधिकाऱ्यांनी देऊन व महसूल मंडळाला कारवाईची परवानगी मिळूनही प्रत्यक्षात कोणतीही ठोस अंमलबजावणी झालेली नाही अशी खंत व्यक्त केली. सामाजिक कार्यकर्त्या भारती माळी यांनी शेतकऱ्यांच्या पांदण रस्त्यांचा व दुरुस्तीचा प्रश्न मांडत तलाठ्यांकडे वारंवार मागण्या करूनही पावसाळ्यात शेतात जाण्यासाठी रस्ता मिळत नसल्याची अडचण सांगितली. घरकुल योजना, रमाई व शबरी आवास योजनेचा लाभ खऱ्या गरजूंपर्यंत पोहोचवावा, लाभार्थी निवडीत पारदर्शकता ठेवावी आणि निराधार योजनेचे मानधन सुरू करावे, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली. प्रशासनाने या प्रकरणांची तात्काळ दखल घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. या ग्रामसभेस माजी उपसरपंच भैय्या कढरे, ग्रामपंचायत सदस्य अमोल कोळी, शिवाजी रोकडे, भगवान बाविस्कर, रावसाहेब भोगे, सुधाकर रायते, सुनील कढरे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.