पान दोन
---------------
14648
नाशिक : गळतीमुळे वाया जात असलेले पाणी.
भद्रकाली मार्केट-बादशाही कॉर्नर परिसरात पाणीगळती
मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष; वाहिनी दुरुस्तीची नागरिकांची मागणी
सकाळ वृत्तसेवा
जुने नाशिक ता.३ : शहरातील अनेक भागांत नागरिकांना कमी दाबामुळे पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. दुसरीकडे महापालिका पाणीपुरवठा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हजारो लिटर पिण्याचे पाणी दररोज रस्त्यावरून वाहून जात असल्याचा संतापजनक प्रकार भद्रकाली मार्केट-बादशाही कॉर्नर परिसरात सुरू आहे. दररोज सायंकाळी या भागात ५.३० ते ७ वाजेपर्यंत वाहिनीतून मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत आहे, मनपाच्या कारभारावर नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
भद्रकाली परिसरात विविध विकासकामे, रस्त्यांची खोदकामे आणि इतर कामांमुळे ठिकठिकाणी खड्डे खोदण्यात आले आहेत. या खोदकामादरम्यान पाईपलाईन फुटण्याचे प्रकार घडत आहे, त्यातून मोठ्या प्रमाणात पिण्याचे पाणी वाया जात आहे. काही दिवसांपूर्वी याच भागात मोठी पाईपलाईन फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले होते. त्याबाबत प्रभाग सभेत प्रश्न उपस्थित करून संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला होता. पाइपलाइन फुटणे, खोदकामामुळे निर्माण झालेले खड्डे आणि त्यातून होणारा पाण्याचा अपव्यय याकडे तातडीने लक्ष देण्याची मागणीही करण्यात आली.
मात्र, प्रश्न उपस्थित करूनही संबंधित अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. दरम्यान, रस्त्यावर साचणाऱ्या आणि वाहणाऱ्या पाण्यामुळे परिसरातील व्यावसायिक तसेच खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने पाहणी करून पाणीगळती कायमची बंद करावी, अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात आली.