पान दोन
12096
इंदिरानगर : अधिकाऱ्यांशी चर्चा करताना नगरसेवक चंद्रकांत खोडे, यशवंत निकुळे, प्रकाश नन्नावरे आदी
दोन दिवसात प्रभागातील दूषित पाण्याचा प्रश्न सोडवा
आजी, माजी नगरसेविकांकडून आंदोलनाचा इशारा
सकाळ वृत्तसेवा
इंदिरानगर, ता.२२ : पुढील दोन दिवसात प्रभाग क्रमांक २३ मधील दूषित पाणीपुरवठा प्रश्न सुटला नाही तर या भागातील नागरिकांसमवेत हे दुर्गंधीयुक्त पाणी थेट आयुक्तांच्या दालनात बाटल्यांमध्ये घेऊन येऊ असा इशारा नगरसेवक चंद्रकांत खोडे , माजी नगरसेवक यशवंत निकुळे आणि प्रकाश नन्नावरे यांनी दिला आहे. सोमवारी (ता.२२) दुपारी प्रभारी अधीक्षक अभियंता मैंद, कार्यकारी अभियंता राजेंद्र शिंदे, निकम, उपअभियंता जगताप आदींसोबत झालेल्या बैठकीत हा इशारा देण्यात आला.
मागील पंधरा दिवसापासून साईनाथ नगर भागात सुखदेव शाळा परिसरातील विविध सोसायटींसह अनेक भागात दूषित पाणी पुरवठ्याने नागरिक हैराण झाले आहेत. दूषित पाण्यामुळे अनेकांना जुलाब उलट्यांचा त्रास देखील सुरू झाला आहे. एका ठिकाणी चेंबरमधून हे पाणी पाण्याच्या पाइपलाइन मध्ये जात असल्याचे आढळून आल्यानंतर ते सडलेले पाईप देखील बदलण्यात आले . मात्र पुन्हा या तक्रारी दिपाली नगर पर्यंत पोचल्या आहेत. मुळात या सर्व सांडपाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्या पंचवीस वर्षे जुन्या आहेत. या वाहिन्यांची क्षमता देखील आता संपली आहे. बरेचसे चेंबर वापरा पलीकडे गेले आहेत. पाण्याच्या लाइन देखील ३० ते ३६ वर्षे जुन्या आहेत. त्याही खराब झाल्या आहेत. त्यामुळे हे दुर्गंधी युक्त पाणी थेट या वाहिन्यांद्वारे घराघरात जात आहे . अमृत जल २ योजनेअंतर्गत तातडीने या पाइपलाइनचे मंजूर असलेले काम सुरू करण्याचे तसेच या भागातील संपूर्ण ड्रेनेज लाइन बदलण्याची मागणी करण्यात आली. जर मागण्यांची दखल घेतली नाही तर अन्यथा परिसरातील नागरिकां समवेत प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
---------------
जास्तीचे टँकरचा केवळ आदेश
दूषित पाण्याच्या अनुषंगाने बुधवारी (ता.१७) ला नगरसेविका संध्या कुलकर्णी यांनी आयुक्त मनीषा खत्री यांच्याकडे कैफियत मांडल्यानंतर प्रभाग २३ साठी तातडीने चार टँकर स्वतंत्र उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अद्याप हे टँकर मिळाले नसल्याची माहिती कुलकर्णी यांनी दिली आहे. त्यात रविवारी (ता.२१) गांधीनगर येथील जलशुद्धीकरण केंद्रातील व्हॉल्व्ह नादुरुस्त झाल्याने दोन दिवसांपासून नागरिकांना पाणी मिळाले नाही. ही दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर आज कमी दाबाने पाणी पुरवठा या भागात झाला. मात्र तरी देखील अनेक भागातून पाण्याच्या तक्रारी आहेत.