12115
विनयनगर: दूषित पाणी दाखवताना नागरिक.
प्रभाग २३ मध्ये दूषित पाण्यामुळे मुलांना कावीळ ?
सकाळ वृत्तसेवा
इंदिरानगर, ता.२३ : प्रभाग क्रमांक २३ मधील दूषित पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून विनय नगर भागातील पाच जणांना कावीळ झाल्याचा दावा सामाजिक कार्यकर्ते प्रवीण जाधव यांनी दिली आहे. या भागातील जीर्ण झालेल्या ड्रेनेज लाईन आणि सडलेल्या पाइपलासनद्वारे दुर्गंधीयुक्त पाणी थेट घराघरात पोचत असल्याने गेल्या तीन आठवड्यांपासून पोट दुखी, उलट्या आणि आता कावीळ झाली आहे. विनयनगर येथील श्री सप्तशृंगी मंदिर परिसरातील कपालेश्वर अपार्टमेंट आणि आसपासच्या इतर ५ ते ६ सोसायट्यांमध्ये नागरिकांना थेट गटाराचे पाणी मिळत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. दूषित पाण्यामुळे परिसरातील ३ ते ४ लहान मुलांना ''कावीळ'' झाली असून अजून दोघे बिटको रुग्णालयात उपचार घेत असल्याचे जाधव यांनी सांगितले. सुरुवातीला साईनाथ नगर आणि सुखदेव शाळा परिसरातील काही सोसायटीमध्ये हा प्रश्न आहे असे वाटत असतानाच ही परिस्थिती आता सुचिता नगर, दीपाली नगर आणि आता विनय नगर परिसरात देखील पसरत असल्याने प्रशासनाने तातडीने याबाबत गंभीर पावले उचलण्याची मागणी केली.
दूषित पाण्याच्या बाबतीत लोकप्रतिनिधी आणि मनपा प्रशासनाकडे तक्रारी केल्या आहे. मात्र ठोस उपाययोजन करण्यात आलेल्या नाही. दूषित पाणी पिल्याने लहान मुलांच्या आरोग्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण झाला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी मनपा प्रशासनाची असेल.
प्रवीण जाधव, सामाजिक कार्यकर्ते