PLS26B01813
घागबारी (ता.सुरगाणा) ः येथे तंत्रज्ञान बीजप्रक्रियाचे मार्गदर्शन करताना तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर तिखे.
---------
३०-३
कमी कालावधीच्या वाणांचा वापर करा
---------
कृषी विभागाचा सल्ला; सुरगाण्यात ३० हजार हेक्टरवर पेरणीचे उद्दिष्ट
---------
सकाळ वृत्तसेवा
पळसण, ता.१४ ः आगामी खरीप हंगामासाठी सुरगाणा तालुका सज्ज झाला असून, हवामान खात्याचा अंदाज लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी योग्य नियोजन करावे, विशेषतः कमी कालावधीत येणाऱ्या वाणांची निवड आणि १०० मिमी पाऊस झाल्यानंतरच पेरणीचा श्रीगणेशा करावा, असा सल्ला तालुका कृषी अधिकारी ज्ञानदेव तिखे यांनी दिला.
उताराला आडवी मशागत: जमिनीतील ओलावा टिकवण्यासाठी शेतकऱ्यांनी उताराला आडवी नांगरट आणि मशागत करावी. यामुळे जमिनीची धूप थांबून पाणी जमिनीत मुरण्यास मदत होईल. खतांच्या वाढत्या किमती आणि जमिनीचा पोत लक्षात घेता, माती परीक्षणानुसारच संतुलित खतांचा वापर करावा. यामुळे अनावश्यक खर्च वाचणार आहे असेही श्री. तिथे यांनी सांगितले.
बियाण्यांपासून होणारे रोग टाळण्यासाठी पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया करणे अत्यंत आवश्यक आहे. हवामानातील बदल पाहता, यंदा शेतकऱ्यांनी लवकर येणाऱ्या वाणांची निवड करावी, जेणेकरून पावसाचा ओढ लागल्यास पिकाचे नुकसान होणार नाही. खरीप हंगामाच्या नियोजनाबाबत अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी आपल्या गावातील कृषी सहाय्यक, मंडळ कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालय, सुरगाणा यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
सुरगाणा तालुक्यात खरीप हंगामासाठी सरासरी ३०,४५५.६५ हेक्टर क्षेत्र उपलब्ध आहे. गेल्या वर्षी प्रत्यक्ष २८,६६४.३१ हेक्टरवर पेरणी झाली होती. तालुक्यात एकूण क्षेत्रापैकी १,१५० हेक्टर क्षेत्र बागायती असून, तेथे स्ट्रॉबेरी व भाजीपाला पिकांचे उत्पादन घेतले जाते.
-----------
कोट
शेतकऱ्यांनी घाई न करता पुरेसा पाऊस झाल्यावरच पेरणी करावी. उताराला आडवी पेरणी आणि बीजप्रक्रियेमुळे उत्पादनात निश्चितच शाश्वत वाढ होईल."
- ज्ञानदेव तिखे (तालुका कृषी अधिकारी, सुरगाणा)
-----------