पान-३ साठी--मेन नुकसानीची फोटो वापरणे
---------------
अतिवृष्टीग्रस्तांना २५.५३ कोटींची मदत
---------------
निफाड तालुक्यातील सात मंडळांसाठी विशेष बाब म्हणून निर्णय ः लवकरच खात्यावर जमा होणार
-------------
सकाळ वृत्तसेवा
पिंपळगाव बसवंत, ता.१ ः निफाड तालुक्यात गतवर्षी ऑक्टोबरमध्ये झालेल्या सततच्या पावसामुळे शेतीपिकांचे नुकसान झालेल्या तालुक्यातील १७ हजार ४३१ शेतकऱ्यांना विशेष बाब म्हणून सुमारे २५.५३ कोटी मदत जाहीर असल्याची माहिती आमदार दिलीप बनकर यांनी दिली.
निफाड तालुक्यात गतवर्षी मे महिन्यापासून पाऊस सुरु झालेला होता. त्यातच खरीप हंगामामध्ये २६ ते २९ ऑक्टोबर या कालावधीत अवेळी पाऊस, ६५ मिलिमीटरपेक्षा कमी पावसामुळे सोयाबीन, मका, भुईमूग, उडीद, मुग, तूर, बाजरी, कांदा, टोमॅटो, ऊस, भाजीपाला तसेच द्राक्ष, डाळिंब, पेरू व इतर फळपिकांचे सततच्या पावसामुळे नुकसान झाले होते. तालुक्यात सर्व अकरा महसूल मंडळांत अतिवृष्टीची नोंद झालेली होती. यापैकी चार महसूल मंडळामध्ये यापूर्वीच नुकसान भरपाई अदा झालेली होती. मात्र उर्वरित पिंपळगाव बसवंत, रानवड, ओझर, पालखेड, निफाड, चांदोरी व देवगाव या ७ महसूल मंडळामध्ये ६५ मिलिमीटरपेक्षा कमी व सततच्या पावसामुळे शेती पिकांप्रमाणेच द्राक्ष आदी फळपिकांचे नुकसान झालेले होते. मात्र त्यांना मदत मिळालेली नव्हती. संबंधित विभागाच्या अहवालानुसार तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांना भरपाईसाठी आमदार बनकर यांनी सतत पाठपुरावा केला होता. त्यानुसार शासन निर्णयानुसार उर्वरीत ७ महसूल मंडळामधील नुकसान झालेल्या १७४३१ शेतकऱ्यांना सुमारे २५.५३ कोटी मदत जाहीर केलेली आहे.
१६-१
केवायसी पडताळणी होणार
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा डाटा शासनाच्या पोर्टलवर अपलोड केल्यानंतर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची केवायसी पूर्ण झाल्यावर लवकरच नुकसान भरपाईची रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यास वर्ग होणार आहे. शासनाने एक वेळची विशेष बाब म्हणून मदत जाहीर केल्याबद्दल आमदार बनकर यांनी जनतेतर्फे आभार मानले आहेत.
--------------
२०-२ चौकट
या निकषांमुळे मिळाली मदत
सातही महसूल मंडळामध्ये ६५ मिलिमीटरपेक्षा कमी व सततच्या पावसामुळे शेती पिकांप्रमाणेच द्राक्षाचे मोठे नुकसान झाले होते. तालुक्यात सरासरीपेक्षा १५८.९६ टक्के जास्त पाऊस झालेला असल्याने द्राक्षबागेत पाणी साठवून द्राक्षपिकांच्या मुळांची कुज होऊन व इतर विविध कारणांमुळे द्राक्षबागेची फळधारणा होऊ शकली नाही. त्यामुळे द्राक्ष पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन बहुसंख्य द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत आले होते. आमदार बनकर यांनी शासनाकडे सतत पाठपुरावा केल्याने तालुक्यातील नुकसानीची सद्यःस्थिती जाणून घेत वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर झाल्याने भरपाई मंजूर करण्यात आली.
------------