पान दोन मेन
-----------
१०१२५
साकोरे मिग (ता.निफाड) : उंबरखेड दरम्यान कादवा नदीवरीलपुलाचे काम रखडल्याने नदीपात्रातून विद्यार्थांचा जीवघेणा प्रवास.
जीव धोक्यात घालून विद्यार्थ्यांचा धोकादायक प्रवास
निधीअभावी ''साकोरे-उंबरखेड'' पुलाचे काम सहा महिन्यापासून ठप्प
सकाळ वृत्तसेवा
पिंपळगाव बसवंत, ता. १६ : शिक्षणासाठी दररोज नदी ओलांडून प्रवास करण्याचा अत्यंत कठीण अन् जीवघेणा प्रसंग साकोरे मिग (ता. निफाड) परिसरातील विद्यार्थ्यांवर ओढवला आहे. राज्य शासनाकडून मंजूर निधीची रक्कम ठेकेदाराला वेळेवर मिळत नसल्याने साकोरे-उंबरखेड रस्त्याचे व पुलाचे काम पूर्णपणे रखडले आहे. त्यामुळे कादवा नदीपात्रातून विद्यार्थ्यांना दररोज धोका पत्करून प्रवास करावा लागत असून, शासनाने निधी उपलब्ध करून सुरक्षित मार्ग उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी पालकांकडून केली जात आहे.
साकोरे-उंबरखेड भागातून वाहणाऱ्या कादवा नदीवर गेल्या ५० वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या पुलाचे काम आमदार दिलीप बनकर यांच्या प्रयत्नांतून दोन वर्षांपूर्वी सुरू झाले होते. या पुलामुळे साकोरे व उंबरखेड गावांची पिंपळगावसह महामार्गाशी कनेक्टिव्हिटी वाढणार आहे. युद्धपातळीवर सुरू असलेल्या या कामाचे बीम उभे राहिले असून, गर्डर व स्लॅब टाकण्याचे काम सुरू होणार होते. मात्र, शासनाकडून मंजूर निधी मिळत नसल्याने गेल्या सहा महिन्यांपासून हे काम पूर्णपणे ठप्प झाले आहे. याचा मोठा फटका स्थानिक शेतकरी आणि विद्यार्थ्यांना बसत आहे.
-----------
लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
कादवा नदीच्या पलीकडे असलेल्या परिसरातील सुमारे ५० विद्यार्थी रोज साकोरे, पिंपळगाव बसवंत आणि ओझर येथे शिक्षणासाठी जातात. सध्या झालेल्या पावसामुळे कादवा नदीपात्रात तीन ते चार फुटांपर्यंत पाणी आहे. हे वाहते पाणी ओलांडून शाळा गाठणे लहान मुलांसाठी अत्यंत धोकादायक ठरत असून, पालकांमध्ये तीव्र चिंतेचे वातावरण पसरले आहे.
शासनाकडून निधी मिळत नसल्याने ठेकेदाराने काम थांबवले आहे. पूल अर्धवट स्थितीत असल्याने शासनाचा विकासाचा मुख्य उद्देश पूर्ण होताना दिसत नाही. शासनाने तात्काळ निधी उपलब्ध करून दिल्यास पुलाचे काम पूर्ण होऊन दळणवळणाची व विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची समस्या कायमची दूर होईल.
- अनिल बोरस्ते (माजी सदस्य, पंचायत समिती)