(पान ४ ला ॲंकर)
SKD26B04064
शिंदखेडा : पत्रकार परिषदेत बोलताना नगराध्यक्षा कलावती माळी, नगरसेवक व पदाधिकारी.
---------
अत्यावश्यक निविदांना स्थगिती; विरोधकांकडून अडथळ्यांचा प्रयत्न
नगराध्यक्षा कलावती माळी : पत्रकार परिषदेत मांडली भूमिका
सकाळ वृत्तसेवा
शिंदखेडा, ता. २५ : नगरपंचायतीच्या स्थायी समितीच्या सभेत अत्यावश्यक कामांच्या वार्षिक निविदांना मंजुरी देण्याऐवजी काही विषय स्थगित ठेवण्यात आल्याने शहरातील दैनंदिन सेवा व विकासकामांवर परिणाम होत आहे. याबाबत आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी विरोधी गटावर नागरिकांच्या कामांमध्ये अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे सांगितले.
नगराध्यक्षा माळी म्हणाल्या, स्थायी समितीच्या सभेत विविध विषयांवरील निविदांना मंजुरी अपेक्षित होती. मात्र, वीस निविदांपैकी जलशुद्धीकरण केंद्रासाठी मनुष्यबळ पुरवठा, बांधकाम साहित्य व मजुरी कामे, गटारींवर ढापे टाकणे, मुरूम पुरवठा, जंतुनाशक फवारणी व धुरळणी, मोकाट जनावरांवर कारवाई, बी. के. देसले नगर परिसरातील गटारींची समस्या सोडविण्याच्या कामांना स्थगिती देण्यात आली. शहरातील विविध ठिकाणी बोअरवेल करून पिण्याच्या पाण्यासाठी मोटार बसविण्याचा विषयही फेरनिविदेसाठी स्थगित ठेवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
‘नियमांनुसार निविदा प्रक्रिया राबवून कमी दरातील व योग्य निविदा समितीसमोर ठेवल्या होत्या. तरीही काही सदस्यांनी जाणीवपूर्वक फेरनिविदांचा मुद्दा उपस्थित करून कामे खोळंबविण्याचा प्रयत्न केला’, असा आरोप त्यांनी केला. पावसाळा सुरू झाल्याने गटारीवरील ढापे, मुरूम टाकणे, जंतुनाशक फवारणी, धुरळणी आणि जलशुद्धीकरण केंद्रावरील मनुष्यबळ या अत्यावश्यक बाबी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सुकवद व जलशुद्धीकरण केंद्रावरील पाच ते सहा मजुरांचे गेल्या पाच महिन्यांपासून वेतन थकीत असून, मनुष्यबळाच्या अभावामुळे हा प्रश्नही प्रलंबित असल्याचे त्यांनी नमूद केले.
प्रभाग क्रमांक नऊमधील बी. के. देसले नगर येथे गटारीचे काम रखडल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनल्याचे सांगत, ‘समोरच्या गटाला नागरिकांच्या दैनंदिन अडचणींबाबत कोणतीही संवेदनशीलता नाही,’ अशी टीका त्यांनी केली. स्थायी समितीचे सदस्य पाशवी बहुमताच्या जोरावर नगराध्यक्षा व प्रशासनाला वेठीस धरण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप करीत नागरिकांच्या गरजा पूर्ण न झाल्यास त्याला विरोधी गटातील सदस्य जबाबदार राहतील, असा इशाराही त्यांनी दिला.
दरम्यान, या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष, नगरसेवक, ज्येष्ठ नागरिक व महिलांच्या सहभागातून लवकरच जनआंदोलन छेडून हा विषय वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्यात येणार असल्याची माहितीही नगराध्यक्षा कलावती माळी यांनी दिली. या वेळी नगरसेविका राजूबाई माळी, पुष्पाताई सोनवणे, नगरसेवक अर्जुन भिल, स्वीकृत नगरसेवक दीपक माळी, सुभाष माळी, राहुल पाटोळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.