SKD26B04234
बाम्हणे (ता. शिंदखेडा) : येथील महावितरणच्या उपकेंद्र कार्यालयासमोर शेतकऱ्यांचे बैलांसह आंदोलन करताना शांनाभाऊ सोनवणे.
----------------
पिकांना पाणी नाही, निदान बैलांना तरी द्या
शेतकऱ्यांचे बैलांसह वीज उपकेंद्रासमोर आंदोलन
सकाळ वृत्तसेवा
शिंदखेडा, ता. १० : खरीप पिकांना पाण्याची गरज असताना कृषी पंपांना नियमित वीजपुरवठा होत नसल्याच्या निषेधार्थ लंघाणे, साहूर, कोडदे व बाम्हणे परिसरातील शेतकऱ्यांनी गुरुवारी (ता. १०) अनोख्या पद्धतीने आंदोलन केले. बैल पोळ्याच्या निमित्ताने शेतकरी बैलांसह बाम्हणे येथील महावितरणच्या उपकेंद्र कार्यालयात दाखल झाले. या वेळी शिवसेनेचे धुळे ग्रामीण जिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांच्या हस्ते बैलांची पूजा करण्यात आली.
‘आमच्या पिकांना पाणी देता येत नसेल, तर निदान आमच्या बैलांसाठी तरी चारा-पाण्याची सोय करा,’ असा भावनिक सवाल सोनवणे यांनी महावितरण प्रशासनाला केला. या वेळी उपअभियंता पावरा यांना शेतकऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले. कृषी पंपांना दिवसा नियमित वीज मिळत नसून रात्रीचा वीजपुरवठाही अनियमित राहत असल्याने शेतकऱ्यांना अंधारात शेतात जावे लागत असल्याची तक्रार करण्यात आली. आठ तास वीजपुरवठ्याचे वेळापत्रक असतानाही प्रत्यक्षात त्यात कपात केली जाते. तसेच, ‘लोड शेडींग’ व तांत्रिक कारणांमुळे वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला.
कृषी वीजपुरवठा तातडीने सुरळीत न झाल्यास महावितरण कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करून कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा सोनवणे यांनी दिला. या वेळी लोहगावचे माजी सरपंच महेंद्र पाटील (पप्पू दादा), लंघण्याचे माजी सरपंच महेंद्र पाटील, शेतकरी रामसिंग गिरासे, रवींद्र गिरासे, राहुल पाटील, योगेश पाटील, गोरख पाटील, रणजीत गिरासे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
--------
हंगाम धोक्यात येण्याची शक्यता
दिवसा वीज उपलब्ध होत नसल्याने रात्री शेतात जाणाऱ्या शेतकऱ्यांना सर्प- विंचू, वन्यजीव, चोरी तसेच विद्युत अपघातांचा धोका पत्करावा लागत असल्याचे सोनवणे यांनी सांगितले. पिकांना निर्णायक अवस्थेत पाण्याची गरज असताना वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास हंगाम धोक्यात येण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली. या वेळी ‘शेतकऱ्यांना वीज मिळालीच पाहिजे’, ‘बैलांना चारा मिळालाच पाहिजे’, ‘आठ तास वीज मिळालीच पाहिजे’, ‘महावितरणचा धिक्कार असो’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.