धनेर परिसरात शेतीसाहित्य चोरीच्या घटनांत वाढ
---
संतप्त शेतकऱ्यांचा पिंपळनेर पोलिस ठाण्यावर मोर्चा; पाच संशयित पोलिसांच्या ताब्यात
सकाळ वृत्तसेवा
सामोडे, ता. २२ : धनेर, खट्याळ, तोरणकुडी, आमळी भागात वीजपंप, केबल व कृषी साहित्य चोरीला जात आहे. वारंवार होणाऱ्या चोरीमुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. अखेर संतप्त शेतकरी आणि ग्रामस्थांनी पिंपळनेरचे प्रभारी पोलिस अधिकारी किरण बर्गे यांना निवेदन दिले.
चोरीच्या घटनांचा सूत्रधार कोण आहे, याचा छडा लावून संबंधितांना जेरबंद करण्याची मागणी निवेदनात केली आहे.
दरम्यान, नागरिकांनी पाच संशयितांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. संशयितांपैकी काही जण अल्पवयीन व शाळकरी विद्यार्थी असल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. मात्र, या टोळीमागील मुख्य सूत्रधार अद्याप समोर आला नसल्याने त्याला तत्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली. चोरीच्या घटनांवर तातडीने आळा घालावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थ आणि शेतकरी बांधवांनी प्रशासनाला दिला आहे.
निवेदन देतेळी मधुकर बागूल, प्रभात गांगुर्डे, विलास गांगुर्डे, भालचंद्र चौरे, अमृत अहिरे, संजय कानडे, भूषण पाटील, शिवाजी पाटील, टेनसिंग अहिरे, रतिलाल साबळे, विजय पाटील, प्रताप पाटील, नागरिक व शेतकरी उपस्थित होते.
चोरीचा माल दहिवेल येथील एका भंगार विक्रेत्याला विकला जात असल्याची माहिती संशयितांनी चौकशीदरम्यान दिली. त्यावरून पोलिसांनी तीन संशयितांना सोबत घेऊन दहिवेल येथे तपास मोहीम राबविली. चोरीच्या मालाची पडताळणी आणि संबंधितांची चौकशी सुरू असल्याची माहिती मिळाली. सध्या पाच संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. एएसआय बापू पिंपळे तपास करीत आहेत.