पान दोन मेन
---------------
06868
सटाणा : बागलाण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे कार्यकारी अभियंता देवेंद्र उंबरकर यांना निवेदन देताना तालुकाध्यक्ष राजेंद्र सोनवणे, भारत खैरनार, संदीप वाघ, अशोक भामरे, नंदराज देवरे, दादाजी खैरनार आदी.
महावितरणाच्या कारभाराविरोधात राष्ट्रवादी आक्रमक
सटाण्यात पदाधिकाऱ्यांकडून अधिकाऱ्यांना कंदील, मेणबत्ती भेट
सकाळ वृत्तसेवा
सटाणा, ता. १५ : भर उन्हाळ्यात सटाणा शहर आणि परिसरात वारंवार तासन्तास वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांचा संताप अनावर झाला आहे. महावितरणच्या ढिसाळ कारभाराचा निषेध करण्यासाठी शुक्रवारी (ता. १५) बागलाण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे तालुकाध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली महावितरण कार्यालयावर आक्रमक ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी वीज अधिकाऱ्यांना ''गांधीगिरी'' मार्गाने कागदी पंखे, मेणबत्त्या आणि कंदील भेट देऊन प्रशासनाचा निषेध नोंदवण्यात आला.
सध्या पारा ४२ अंश सेल्सिअसवर पोहोचला असताना, दिवस-रात्र सुरू असलेल्या विजेच्या लपंडावामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. भर उन्हात वीज गायब होत असल्याने ज्येष्ठ नागरिक, रुग्ण आणि लहान मुलांचे प्रचंड हाल होत आहेत. उकाड्यामुळे पंखे, कुलर आणि पाण्याच्या मोटारी बंद राहत असल्याने घरातील दैनंदिन कामांचा खोळंबा होत आहे. रात्रीच्या वेळीही तासन्तास अंधार राहत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे आणि संतापाचे वातावरण आहे. वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याचा मोठा फटका स्थानिक बाजारपेठेला बसत आहे. शीतपेय विक्रेते, आइस्क्रीम पार्लर आणि हॉटेल व्यावसायिकांचे फ्रिज बंद पडल्याने मोठे आर्थिक नुकसान होत आहे. घरगुती उपकरणे जळण्याचे प्रमाण वाढले असून, अनेक भागांत पाणीपुरवठा योजनाही विस्कळीत झाल्या आहेत.
या आंदोलनात तालुकाध्यक्ष राजेंद्र सोनवणे, संदीप वाघ, भारत खैरनार, संदीप भामरे, दिगंबर सोनवणे, नंदराज देवरे, अनिल पाटील, अशोक भामरे, रणधीर मोरे, दादाजी खैरनार, हेमंत मगर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
----
अधिकाऱ्यांकडून शून्य प्रतिसाद
वीज गुल झाल्यानंतर महावितरणचे अधिकारी किंवा कर्मचारी फोन उचलत नसल्याची तक्रार आंदोलकांनी केली. या संपर्कहीनतेमुळे संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी कार्यकारी अभियंता देवेंद्र उंबरकर यांना जाब विचारत यापुढे कोणतीही पूर्वसूचना न देता वीज कापल्यास आगामी काळात तीव्र जनआंदोलन छेडले जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
भर उन्हाळ्यात जनतेला विजेसारखी मूलभूत सुविधा मिळत नसेल, तर हा केवळ तांत्रिक बिघाड नसून प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभाराचा परिणाम आहे. महावितरणने तातडीने परिस्थिती सुधारावी, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस जनतेसह रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही.
राजेंद्र सोनवणे, तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
उन्हाळ्यात वाढलेल्या विजेच्या मागणीमुळे काही ठिकाणी तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. नागरिकांना झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत. तातडीने दुरुस्ती व नियोजनात्मक उपाययोजना करून सटाणा शहर व परिसरातील वीजपुरवठा स्थिर ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
देवेंद्र उंबरकर, कार्यकारी अभियंता, महावितरण, सटाणा विभाग