पान तीन
------------------
22585
सिन्नर : नगर परिषदेत स्वच्छता विभागाच्या बैठकीत कर्मचाऱ्यांना सूचना करताना नगराध्यक्ष विठ्ठल उगले. समवेत अभिजित कदम, लता हांडे, अनिल सरवार, सुदर्शन नाईक आदी.
स्वच्छतेत हलगर्जीपणा खपवून घेणार नाही
नगराध्यक्ष विठ्ठल उगले : स्वच्छता समिती बैठकीत कर्मचाऱ्यांना इशारा
सकाळ वृत्तसेवा
सिन्नर, ता. ४ : शहरातील स्वच्छतेच्या कामात कोणत्याही प्रकारची हलगर्जीपणा खपवून घेणार नाही. कर्मचाऱ्यांनी नेमणूकीच्या भागात कार्यरत असावे. त्या भागाची नियमित स्वच्छता राखण्याची जबाबदारी मुकादम व कर्मचाऱ्यांची राहील. प्रत्येकाने सोपविण्यात आलेल्या भागाची स्वच्छता काटेकोरपणे करावी, अशी सूचना नगराध्यक्ष विठ्ठल उगले यांनी केली.
नगरपरिषद कार्यालयात घनकचरा व्यवस्थापनासंदर्भात स्वच्छता विभागासह कर्मचारी, अधिकारी, स्वच्छता समितीच्या बैठकीत ते बोलत होते.
या वेळी मुख्याधिकारी अभिजित कदम, स्वच्छता समितीच्या सभापती लता दत्ता हाडे, नगरसेवक सुदर्शन नाईक, कांताबाई जाधव, सुवर्णा उबाळे, कमळाबाई पगार, लक्ष्मी पवार, अनिल सरवार, स्वच्छता अधिकारी सचिन बोरसे यांच्यासह नगरपरिषदेच्या आरोग्य व स्वच्छता विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
बैठकीत शहरातील कचरा संकलन व्यवस्था अधिक प्रभावी करण्यासाठी उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. शहर स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी ठेवण्यासाठी कचऱ्याचे योग्य संकलन, वर्गीकरण आणि शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याचे नियोजन करणे गरजेचे असल्याचे उगले यांनी सांगितले.
मुख्याधिकारी अभिजीत कदम यांनी कचरा संकलन आणि त्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याबाबत मार्गदर्शन केले. शहरातील प्रत्येक घरातून नियमितपणे कचरा संकलित करण्याबरोबरच संपूर्ण यंत्रणा अधिक कार्यक्षम करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
-----------
कचऱ्याचा ढीग दिसताच कळवा
शहरातील कोणत्याही भागात कचऱ्याचा ढीग साचल्याचे निदर्शनास आल्यास नगरसेवकांनी तातडीने नगरपरिषदेला कळवावे. माहिती मिळताच संबंधित ठिकाणी आवश्यकतेनुसार वाहन अथवा ट्रॅक्टर पाठवून कचरा उचलण्याची व्यवस्था करण्याची सूचना उगले यांनी प्रशासनाला केली. शनिवार व रविवारच्या आठवडे बाजारानंतर रस्त्यावरील कचरा तातडीने उचलण्याची सूचनाही करण्यात आली.
-----
कचऱ्याचे वर्गीकरण करुनच संकलन
आरोग्य सभापती ललिता दत्ता हांडे यांनी नागरिकांनी आपल्या घरातील ओला व सुका कचरा वेगवेगळा करूनच संकलन वाहनाकडे द्यावा, असे आवाहन केले. कचऱ्याचे योग्य पद्धतीने वर्गीकरण झाल्यास त्यावर प्रक्रिया करणे आणि त्याची विल्हेवाट लावणे अधिक सुलभ होणार असल्याचे त्यांनी सांगितले.