पान चार मेन
-------------------
22711
सिन्नर : सूक्ष्म गणेशमुर्तींसह संजय क्षत्रिय.
तीस वर्षात साकारले ५० हजार सूक्ष्म गणेशमूर्ती
सिन्नरच्या ध्येयवेड्या कलाकाराचा जोपासला अनोखा छंद
सकाळ वृत्तसेवा
सिन्नर, ता. १६ : श्री गणेशावरवर असलेल्या असीम भक्तीतून सिन्नरच्या कलाकाराने ३० वर्षात ५० हजार मूर्ती साकारल्या आहेत. यंदा ५० हजार सूक्ष्म मुर्तीचा आकडा पूर्णत्वास नेला आहे. संजय क्षत्रिय यांच्या या छंदाचे जिल्हाभरातून कौतुक होत आहे. पत्नी वंदना आणि मुली पूजा व अक्षदा यांच्या सहकार्याने त्यांनी सूक्ष्म गणेशमूर्ती साकारल्या आहेत. पाव इंचापासून ते तीन इंचापर्यंत या शाडू माती, डिंकापासून तयार करत अतिशय बारकाईने सूक्ष्म काम त्यावर केले आहे.
नववी इयत्तेत असताना रंगकाम करतेवेळी एक छोटीशी गणपतीची मूर्ती त्यांच्या निदर्शनास आली. मोठ्या मूर्तीपेक्षा सूक्ष्म मूर्ती तयार करावी, अशी कल्पना त्यांच्या मनात रुजली. याच प्रेरणेतून त्यांनी सूक्ष्म मुर्ती साकारण्यास सुरुवात केली होती. सुरुवातीला एक हजार गणेशमुर्ती तयार केल्या. त्या पाहण्यासाठी स्थानिक नागरिक, लोकप्रतिनिधींनी त्यांचे कौतुक केले. त्यामुळे या छंदासाठी उत्साह वाढला. कुटुंबाकडूनही प्रोत्साहन मिळाले. २०२१ मध्ये त्यांनी ३३ हजार मुर्ती तयार करण्याचा टप्पा गाठला होता. आता यंदा तो ५० हजार झाला आहे.
बोटाच्या नखाच्या आकाराच्या मूर्ती
प्रत्येक मूर्तीमध्ये वेगळेपण साकारताना संपूर्ण काम हस्तकलेतून करण्यात आले. काही मूर्ती त्रिमुखी, काही पंचमुखी, काही नखाच्या आकाराएवढ्या तर काही गणपती लहानशा सुपारीवर मावेल इतक्या लहान आकाराच्या आहेत. ५१ गणपतीची दहा थरांची दहीहंडी, बाटलीत बंदिस्त मूर्ती, वाघ-उंदीर-मोरावर विराजमान असलेले सूक्ष्म गणपती असे गणेश साकारले आहेत. या मुर्ती पाहण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी गर्दी होत आहे.
या प्रतिकृतींनाही मिळाली दाद
गणेशोत्सवात एक लाख आगपेटींच्या काड्यांपासून सिध्दीविनायक मंदिराची प्रतिकृती, ११ किलो कापसापासून सिद्धीविनायक मंदिर, ११ किलो कापसापासून अक्षरधान मंदिर, २५ किलो साबुदाणा, फेव्हीकॉलपासून ताजमहल, दोन लाख सुवर्णमण्यांपासून अमृतसह मंदिर, दोन हजार खडूच्या सहाय्याने अयोध्या मंदिर, १२ ज्योर्तिलिंगापासून ५१ मंदिरे सूक्ष्म रुपात साकारले आहेत. या कृतींसाठी भिंगाचा वापर करण्यात येतो. या कलेचे दिवंगत राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम, प्रतिभाताई पाटील, प्रणव मुखर्जी, आणि सिनेअभिनेते अमिताभ बच्चन यांनीही पत्र पाठवून कौतुक केले आहे.