THG26B01469
सिन्नर ः ठाणगाव परिसरातील विस्कळीत वीजपुरवठ्याबाबत वीज मंडळाच्या अभियंता हेमांगी पवार यांना निवेदन देताना उपसरपंच विलास मोरे, रामदास भोर यांच्यासह शिष्टमंडळ.
---------------
पाणीसाठा असूनही ठाणगावसह
पाच गावांचा पुरवठा विस्कळीत
------------
खंडीत विजेचा फटका ः नागरिक मेटाकुटीस
------------
सकाळ वृत्तसेवा
ठाणगाव, ता. १४ ः महिनाभरापासून ठाणगाव परिसरातील वीजपुरवठा सतत विस्कळीत होऊ दीर्घकाळ खंडीत राहत आहेत. यामुळे ठाणगावसह पाच गाव पाणीपुरवठा योजनेतून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा विस्कळीत होत असल्याने उंबदरी धरणात पुरेसे पाणी असूनही गाव परिसरात दोन ते तीन दिवसांनी केवळ १५ मिनिटे पाणीपुरवठा केला जात आहे. मुबलक पाणी असूनही ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याची प्रतिक्षा करण्याची वेळ आली आहे. विहिरीत जेमतेम पाणी असलेल्या शेतवस्तीवर राहणाऱ्या शेतकऱ्यांना विजेअभावी पंप सुरु होत नसल्याने जनावरांना पिण्याचे पाणीही देता येत नाही.
दुरुस्तीच्या नावाखाली दिवसभर वीजपुरवठा बंद ठेवून वीज मंडळाकडून ग्राहकांना वेठीस धरले जात आहे. कधी कमी दाबाने तर कधी तासनतास वीजपुरवठा बंद होत असल्याने विजेचे उपकरणे बंद पडण्याचे प्रमाण वाढले आहे. जलशुद्धीकरण केंद्राला नियमित वीज मिळत नसल्याने गावात १५ मिनिटे पाणीपुरवठा केला जात आहे. नळाला पाणी सोडल्यावर वीजपुरवठा बंद राहत असल्याने ग्रामस्थांना पिण्याचे पाणीही मिळत नाही. बॅंका, पतसंस्था व व्यावसायिकांना खंडीत वीजपुरवठ्यामुळे ग्राहकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.
ग्रामपंचायतीतर्फे उपसरपंच विलास मोरे यांनी सिन्नर येथील वीज अभियंता हेमांगी पवार यांना निवेदन देऊन वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे. यावेळी भाजप नेते जयंत आव्हाड, अटल फाउंडेशनचे जिल्हाध्यक्ष रामदास भोर, बाळासाहेब मोरे, प्रमोद उगले, सुभाष शिंदे आदी उपस्थित होते.
-----------------