पान-४ मेन
फोटो- 12896
वणी ः येथील शाहूनगरातील जिल्ह परिषद शाळेच्या स्वच्छता गृहाच्या दुरुस्तीची ग्रामपंचायतीकडे मुख्याध्यापकांनी मागणी करूनही दुर्लक्षामुळे झालेली स्वच्छतागृहाची झालेली दुरवस्था.
लोगो- सकाळ विशेष
शाळांची ‘स्वच्छता’ कागदावरच
शौचालये अस्वच्छ, पाण्याची वानवा; ग्रामपंचायतींना आता कारवाईचा इशारा
दिगंबर पाटोळे ः सकाळ वृत्तसेवा
वणी, ता. ६ : शाळांमध्ये स्वच्छतागृहे आहेत; मात्र त्यांची स्वच्छता होते का, हा प्रश्न गंभीर बनला आहे. कुठे शौचालयांमध्ये अस्वच्छता, कुठे दुर्गंधी, तर कुठे पाण्याचा अभाव, अशा परिस्थितीत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यावे लागत असल्याचे चित्र आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी निगडित या गंभीर प्रश्नाची दखल घेत दिंडोरी पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने अखेर ग्रामपंचायतींना शाळांमधील शौचालये व स्वच्छतागृहाची रोज स्वच्छता करण्याचे निर्देश दिले आहेत. स्वच्छतेत कसूर अथवा निष्काळजी आढळल्यास संबंधित ग्रामपंचायत अधिकाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
.............
तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये बहुतांश विद्यार्थी ग्रामीण कुटुंबांतील आहेत. या चिमुकल्यांना स्वच्छ आणि सुरक्षित वातावरण देणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी असताना अनेक शाळांमध्ये मूलभूत स्वच्छताविषयक सुविधांचीच बोंब आहे. शौचालये असूनही नियमित स्वच्छता होत नसेल, पाणी उपलब्ध नसेल तर अशा सुविधांचा उपयोग काय, असा सवाल पालकांकडून उपस्थित केला जात आहे.
पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने ३१ ऑगस्टला सर्व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना पत्र पाठवून शाळांमधील शौचालये तातडीने स्वच्छ करण्याचे आदेश दिले आहेत. आवश्यकतेनुसार फिनाईलचा वापर करावा, ग्रामपंचायतीच्या सफाई कर्मचाऱ्यांमार्फत रोज स्वच्छता करावी आणि शौचालयांसाठी पुरेसे पाणी उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश दिले आहेत. संबंधित ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी नियमित पाहणी करून स्वच्छता व्यवस्थेत त्रुटी राहणार नाही, याची दक्षता घेण्यासही बजावण्यात आले आहे.
वर्गखोल्यांची अवस्था बिकट आणि स्वच्छतागृहे तर त्याहूनही दयनीय, अशी काही शाळांची परिस्थिती आहे. विद्यार्थ्यांनी वापरायच्या स्वच्छतागृहांची नियमित स्वच्छता होत नसेल, तर त्यांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे केवळ ग्रामपंचायतींना पत्र देऊन प्रशासनाची जबाबदारी संपत नाही; संबंधित अधिकाऱ्यांनी शाळांना भेटी देऊन पाहणी करणे गरजेचे आहे.
शाळांमध्ये स्वच्छ वातावरण राखणे ही ग्रामपंचायत प्रशासनाची जबाबदारी आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी संबंधित या कामात हलगर्जी सहन केला जाणार नाही. स्वच्छता किंवा पाणीपुरवठ्यात त्रुटी अथवा निष्काळजी आढळल्यास संबंधितांवर प्रशासकीय कारवाई केली जाईल, असा इशारा गटविकास अधिकाऱ्यांनी दिला आहे.
शाळांमधील स्वच्छतेच्या नावाखाली केवळ एखाद्या दिवशी साफसफाई करून त्याचे फोटो काढणे आणि नंतर पुन्हा परिस्थिती ‘जैसे थे’ राहणे, हा प्रकार थांबण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांना दररोज वापरता येईल, अशी स्वच्छतागृहे आणि अखंडित पाणीपुरवठा मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रशासनाने पत्रव्यवहारापेक्षा प्रत्यक्ष पाहणी, जबाबदारी निश्चिती आणि कारवाई यावर भर देण्याची मागणी पालकांकडून होत आहे.
............
चौकट
आदेशांची कागदावरच पूर्तता
शाळांच्या स्वच्छतेबाबत शासनाचे आदेश नवीन नाहीत. वेळोवेळी आदेश, सूचना आणि पत्रव्यवहार होतात. मात्र, प्रत्यक्ष शाळांमध्ये परिस्थिती बदलते का, हा खरा प्रश्न आहे. आदेश काढणे आणि त्याची अंमलबजावणी तपासणे यामध्ये मोठी दरी असल्यानेच ग्रामीण शाळांमधील स्वच्छतागृहांची दुरवस्था कायम असल्याची टीका होत आहे.
......