पान-१
फोटो---सिंगल
VNI26B12966 ः मार्कंडेय पर्वत.
------------
मार्कंडेय पर्वतावर ऋषीपंचमी यात्रेला यंदाही बंदी
------------
प्रशासनाचा ‘बंदी’चाच कित्ता; चार वर्षांत कायमस्वरूपी उपाययोजना नाही, भाविकांमध्ये संताप
------------
सकाळ वृत्तसेवा
वणी, ता. १४ : मार्कंडेय ऋषींची पावन तपोभूमी आणि हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र मार्कंडेय पर्वतावरील ऋषीपंचमी यात्रोत्सवावर प्रशासनाने यंदाही बंदी कायम ठेवली आहे. मंगळवारी (ता.१५) होणाऱ्या यात्रेसाठी मार्कंडपिंपरी ग्रामस्थ, सरपंच व पंचकमेटीने यात्रा भरविण्याची मागणी केली होती. मात्र, पर्वतावरील जीर्ण लोखंडी शिड्या, अरुंद व निसरड्या पायवाटा आणि संभाव्य दुर्घटनेचा धोका लक्षात घेऊन उपविभागीय अधिकारी डॉ. कश्मिरा संखे यांनी पर्वतावर जाण्यास मनाई केली आहे. भाविकांना केवळ पहिल्या पायरीपर्यंत दर्शनाची मुभा देण्यात आली आहे.
--------------
दरवर्षी हजारो भाविक श्रद्धेने मार्कंडेय पर्वताची वाट धरतात. नाशिक जिल्ह्यासह महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेशातून भाविक यात्रेसाठी येतात. सोमवती अमावस्या आणि ऋषीपंचमी हे येथील प्रमुख यात्रेचे दिवस मानले जातात. चार वर्षांपासून सुरक्षेच्या कारणास्तव यात्रा बंद करण्याचा निर्णय घेतला जात आहे. त्यामुळे ‘दरवर्षी बंदी घालण्यापेक्षा धोकादायक मार्ग कायमस्वरूपी सुरक्षित करण्यासाठी प्रशासनाने काय केले? असा प्रश्न आता भाविकांकडून उपस्थित होत आहे.
---------
१६-१
चार वर्षे ‘बंदी’; प्रश्न जैसे थे!
पर्वतावर जाणाऱ्या मार्गावरील लोखंडी शिड्या व पायऱ्या जीर्ण झाल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. सपाटी भागाजवळील लोखंडी जिना तुटलेल्या अवस्थेत असल्याचा अहवाल ७ सप्टेंबरला प्रशासनाला प्राप्त झाला. अरुंद मार्गावर मोठी गर्दी झाल्यास चेंगराचेंगरी, पाय घसरून पडणे तसेच दगड कोसळण्याचा धोका असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. गेल्या चार वर्षांत जीर्ण शिड्या बदलणे, मजबूत जिना उभारणे, पायवाट रुंद व सुरक्षित करणे, संरक्षक कठडे बसविणे, सुरक्षा उपाययोजना करण्यासाठी निधी व प्रशासकीय यंत्रणा का राबविण्यात आली नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे. प्रशासनाची सुरक्षेबाबतची भूमिका योग्य असली तरी बंदी हा कायमस्वरूपी उपाय होऊ शकत नाही, अशी भावना भाविकांमध्ये आहे.
------------