पान एक ॲंकर
--------------
12971
मुळाणे बारी : मार्कंडेय पर्वताच्या प्रवेशद्वारावर पायथ्याशी मुळाणे बारीत असलेल्या मार्कंडऋषींच्या मंदीरात पुजन करीत दर्शन घेताना भाविक.
ऋषीपंचमीला पर्वताऐवजी पायथ्याचे दर्शन
सुरक्षिततेच्या कारणास्तव मार्कंडेय ऋषी यात्रोत्सवावर प्रशासनाची बंदी
सकाळ वृत्तसेवा
वणी, ता. १५ : ‘सौ बार काशी... एक बार मार्कंडेय ऋषी...’ अशी अफाट धार्मिक महती असलेल्या श्रीक्षेत्र मार्कंडेय पर्वतावर ऋषीपंचमीच्या निमित्ताने होणाऱ्या पारंपरिक यात्रोत्सवावर प्रशासनाने यंदाही बंदी कायम ठेवली आहे. त्यामुळे पर्वतावर जाऊन मार्कंडेय ऋषींचे दर्शन व पूजाविधी करण्यासाठी आलेल्या भाविकांना मुळाणे बारी येथील पायथ्याशी असलेल्या पहिल्या पायरीवरील मंदिरातच दर्शन घेऊन समाधान मानावे लागले. प्रशासनाच्या या निर्णयामुळे दरवर्षी हजारो भाविकांनी गजबजणारा हा यात्रोत्सव यंदा केवळ तुरळक गर्दीत पार पडला.
सप्तशृंगी गडाच्या सान्निध्यात असलेल्या मार्कंडेय पर्वतावर मार्कंडेय ऋषींचे जागृत देवस्थान आहे. ऋषीपंचमीला येथे दर्शन आणि पूजाविधीला विशेष धार्मिक महत्त्व असल्याने नाशिक, धुळे जिल्ह्यांसह गुजरातमधूनही हजारो भाविक येतात. मात्र, सलग चौथ्या वर्षी यात्रेवर बंदी घालण्यात आल्याने शेकडो वर्षांच्या परंपरेला खंड पडला आहे.
पर्वतावर जाण्यासाठी असलेली अरुंद व कमकुवत लोखंडी शिडी, पावसामुळे निसरड्या झालेल्या पायवाटा आणि अरुंद मार्गामुळे गर्दीच्या वेळी दुर्घटना अथवा चेंगराचेंगरी होण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली. संभाव्य जीवितहानी टाळण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये या यात्रेला बंदी घालण्यात आली.
-------
पोलिसांचा चोख बंदोबस्त
यात्रेच्या पार्श्वभूमीवर वणी व कळवण पोलिसांनी पर्वताकडे जाणाऱ्या मार्गावर कडक नाकाबंदी करून बंदोबस्त तैनात ठेवला होता. केवळ नियमित पूजाविधीसाठी सकाळी आलेल्या काही भाविकांनाच जाण्याची परवानगी देण्यात आली, तर उर्वरित भाविकांनी पायथ्याशीच पूजा करून परतीचा मार्ग धरला.
-----------
व्यावसायिकांचा हिरमोड; सुरक्षेची कायमस्वरूपी मागणी
यात्रेनिमित्त मुळाणे बारी परिसरात प्रसाद व पूजा साहित्याची दुकाने थाटणाऱ्या व्यापाऱ्यांचा भाविकांची संख्या घटल्याने मोठा हिरमोड झाला. भाविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न महत्त्वाचा असला तरी दरवर्षी प्रशासनाने यात्रेवर बंदी घालण्याऐवजी पर्वतावरील धोकादायक मार्ग, शिडी व पायवाटांचे कायमस्वरूपी दुरुस्तीकरण करून सुरक्षित दर्शनाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी जोरदार मागणी भाविक व स्थानिकांकडून केली जात आहे.