पावसाचा किंवा शेतकऱ्यांचा पेरणी करतानाचा फोटो घेमे...
गेल्या वर्षी १३८, तर यंदा फक्त १७ मिमी पाऊस
येवला तालुक्याला मुसळधारेची प्रतीक्षा
सकाळ वृत्तसेवा
येवला, ता. २३ : तालुक्यात यंदा जूनमध्ये आतापर्यंत केवळ १५.३ मिमी पाऊस झाला. तालुक्याचा जूनचा सरासरी पाऊस ८७.९ मिमी असून, त्या तुलनेत यंदा अवघा १७.४ टक्के पाऊस झाल्याने हंगामाच्या सुरुवातीला पावसाचा वेग अत्यंत मंदावलेला दिसत आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षी याच दिवसापर्यंत तब्बल १३८ (१५७ टक्के) मिमी पाऊस झाला होता.
जूनमधील २३ दिवसांत केवळ दोनदा पाऊस पडला असून, त्यातही सोमवारी (ता. २२) १५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. मंगळवारी (ता. २३) जिल्ह्यात विविध भागांत पाऊस पडत असताना येवल्यावर मात्र पुन्हा वक्रदृष्टीच केली आहे. त्यामुळे खरिपाच्या सुरुवातीस शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. विशेषतः पेरणीसाठी आवश्यक ओलावा अद्यापही अनेक भागात अपुरा आहे.
गेल्या वर्षी याच कालावधीत तालुक्यात तब्बल १३८ मिमी पाऊस झाला होता. हा पाऊस जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या एकूण सरासरी (४५३ मिमी) च्या तुलनेत ३१ टक्के पाऊस जूनपर्यत झाला होता. म्हणजेच गेल्या वर्षी पावसाने हंगामाच्या सुरुवातीलाच जोरदार हजेरी लावली होती, तर यंदा पाऊस उशिरा आणि संथ गतीने सक्रिय होत असल्याने खरिपावर मोठा परिणाम होत आहे.
२४ तासांत तालुक्यात १५ मिमी पावसाची नोंद झाली असून, यापूर्वी केवळ ५.३ मिमी इतका मर्यादित पाऊस होता. या एका दिवसातील पावसामुळे एकूण पावसाची नोंद १७.४ मिमीपर्यंत पोहोचली आहे. चालू वर्षात आतापर्यंत केवळ ३.४ टक्केच पावसाची नोंद झाली. यामुळे खरिपाच्या नियोजनावर परिणाम होऊन पेरण्या रखडल्या आहेत. सोमवारी आलेल्या पावसाने शेतकऱ्यांचा आशावाद जागा केला आहे. त्यातच आज जिल्ह्याच्या विविध भागांत पाऊस पडला. मात्र येवल्यावर पुन्हा पावसाने दुर्लक्ष केल्याने शेतकऱ्यांना पेरणीसाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.