पान-३
-----------
YEO26B26532
विखरणी : कवडीमोल दर मिळत असल्याने कोथिंबिरीच्या शेतात सोडलेली जनावरे.
-------------
कोथिंबिरीला मिळाला कवडीमोल भाव
-------------
विखरणीत उभ्या पिकात जनावरे सोडली, जुडीला ५० पैसे भाव, खर्च ७ हजार ६०० रुपयांवर
------------
सकाळ वृत्तसेवा
येवला, ता.३१ : पावसाअभावी संकटात सापडलेल्या बळीराजाच्या अडचणीत आता कोथिंबिरीच्या कवडीमोल बाजारभावाने भर पडली आहे. उत्पादन व वाहतूक खर्च निघणार नसल्याची परिस्थिती निर्माण झाल्याने विखरणी येथील शेतकरी जनार्दन शेलार यांनी २० गुंठ्यांतील उभी कोथिंबिरीत जनावरे सोडून दिली आहेत. मेहनतीने उभे केलेले हिरवेगार पीक डोळ्यांसमोर जनावरांना खायला घालण्याची वेळ आल्याने शेलार यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले.
जनार्दन शेलार यांनी अशोका वाणाच्या कोथिंबिरीची लागवड केली होती. चांगला दर मिळेल आणि उत्पादन खर्च वजा जाता काही उत्पन्न हातात पडेल, या अपेक्षेने त्यांनी पीक घेतले. कोथिंबीर लागवडीसाठी शेलार यांनी तब्बल १० किलो ‘अशोका’ वाणाचे बियाणे वापरले. त्याचा दर ३८० रुपये किलो असल्याने केवळ बियाण्यापोटीच ३ हजार ८०० रुपये खर्च झाला. खतासाठी १ हजार ६०० रुपये, तर जमीन तयार करण्यासाठी २ हजार २०० रुपये खर्च आला. अशाप्रकारे बियाणे, खत आणि मशागत या तीन बाबींवरच ७ हजार ६०० रुपये खर्च झाले आहेत. मात्र कोथिंबीर विक्रीला नेल्यावर जोडीला फक्त ५० पैसे दर मिळत असल्याने आणि यातून विक्रीचा खर्चही निघणार नसल्याने त्यांनी जनावरांपुढे हे पीक टाकून दिले. ही केवळ एका शेतकऱ्याची व्यथा नसून शेतीच्या अर्थकारणासमोरील गंभीर प्रश्न असल्याचे चित्र आहे. कांद्याबाबतही शेतकरी सध्या असाच अनुभव घेत आहेत.
---------------
--------------