पान-१ मेन
YEO26B26655 ---YEO26B26654
गवंडगाव : परिसरात पावसाअभावी करपलेली बाजरी. दुसऱ्या छायाचित्रात अर्धवट वाढ झालेला व करपत चाललेला मका
----------------
मका-बाजरी करपली, सोयाबीनचा पालापाचोळा
------------
येवला तालुक्यात ६० हजार हेक्टरवरील पिकांना दाणे भरण्याच्या काळातच फटका, दुष्काळ दाराशी
-----------
संतोष विंचू ः सकाळ वृत्तसेवा
येवला, ता.१० : महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने हिरव्या आशेने उभी केलेली खरिपाची पिके आता शेतकऱ्यांच्या डोळ्यांदेखत मरणकळा सोसत आहेत. तालुक्यात सुमारे ७५ हजार हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली असताना तब्बल ६० हजार हेक्टरवरील पिकांना दुष्काळाची झळ बसली आहे. दाणे भरण्याच्या निर्णायक टप्प्यावर मका करपू लागला, बाजरीची कणसे संकटात आली आणि सोयाबीनचा पालापाचोळा होऊ लागल्याने उत्तर-पूर्व येवल्यासह पश्चिम पट्ट्यातही दुष्काळ दाराशी येऊन ठेपल्याचे विदारक चित्र आहे.
-----------
पावसाअभावी दोन महिने केवळ सरींवर खरिपाची पिके तग धरून होती. दाणे भरण्याचा काळ सुरू होताच पावसाने मागील महिनाभर ओढ दिल्याने गंभीर संकट निर्माण झाले आहे. शेतात उभ्या पिकांकडे पाहताना शेतकऱ्यांच्या डोळ्यांसमोर कष्ट, खर्च आणि उत्पन्नाची सारी गणिते कोलमडताना दिसत आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात सर्वात कमी पाऊस येवला तालुक्यात झाला आहे मात्र रिमझिमेवर तालुक्यात सुमारे ७५ हजार हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली आहे. त्यापैकी सुमारे ५५ ते ६० हजार हेक्टरवरील पिकांना मोठा फटका बसत आहे.
१६-१
मक्याची सर्वाधिक वाताहत
तालुक्यात सुमारे ४७ हजार हेक्टरच्या आसपास मक्याची पेरणी झाली असून सर्वाधिक नुकसान मक्याचे होत आहे. दाणे भरण्याच्या काळातच पावसाने पाठ फिरवल्याने अनेक ठिकाणी मका उभ्या पिकातच करपू लागला आहे. दाणे भरण्याची शक्यताच मावळली आहे. ज्यांना दाणे आले आहेत, तेही अपेक्षेप्रमाणे न भरल्याने उत्पादनात मोठी घट होण्याची भीती आहे. बाजरीचीही दाणे भरण्याच्या काळात कणसे करपू लागली आहेत. सोयाबीनच्या पिकाचा हिरवा पाला सुकून पाचोळा होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी केलेला सर्व खर्च वाया जाण्याची शक्यता आहे.
१६-१
या भागात सर्वाधिक फटका
पूर्व भागात राजापूर, ममदापूर, खरवंडी, भारम, सायगाव, रहाडीपासून गवंडगाव, देवळाणे, बोकटे, देवठाण, भुलेगाव तसेच उत्तर भागातील अनकाई, नगरसूल परिसरात ७० हून अधिक गावात पिकांची अवस्था बिकट झाली आहे. पश्चिम पट्ट्यातील काही भागातही पावसाअभावी शेती संकटात सापडली आहे. चाऱ्याचाही प्रश्न गंभीर होत आहे. हिरवा चारा उपलब्ध नसल्याने पशुधन जगविण्याचे आव्हान शेतकऱ्यांसमोर उभे ठाकले आहे.
१६-१
पंचनामे करा, मदत द्या
पावसाची कोणतीही चिन्हे दिसत नसल्याने उर्वरित पिकेही हातची जाण्याची भीती आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने गावनिहाय आणि क्षेत्रनिहाय पाहणी करून नुकसानीचे पंचनामे करावेत, पिकांची वस्तुनिष्ठ नोंद घ्यावी आणि बाधित शेतकऱ्यांना शासनाच्या निकषांनुसार तातडीने मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
---------------
कोट
महिन्यापासून पाऊस नसल्याने शेतातच पिके करपू लागली आहे. अजूनही पावसाचा कुठलाच अंदाज नाही, त्यामुळे खरीप हातचा गेलाच आहे, गुंतवलेले भांडवलही वाया जाणार आहे. शासनाने त्वरित पंचनामे करून पीक विमा द्यावा आणि दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी.
- प्रमोद भागवत, शेतकरी, गवंडगाव
--------------
चौकट
★अशी झाली खरिपाची पेरणी..
पिक - सर्वसाधारण क्षेत्र - एकूण पेरणी
ज्वारी - ४ - ००
बाजरी - ७०६५ - ५५४६
मका - ३९४३३ - ४७२९०
मूग - ७६३२ - ६५२२
भुईमुग - २३२४ - १६०९
सोयाबीन - १०३९६ - १३३१७
कापूस - ५३७७ - ५७८
--------------