YEO26B26658
येवला : येथील आगारातून कोकणच्या दिशेने रवाना होणाऱ्या बस.
---------------
गणेशोत्सवासाठी येवल्याहून २४ बस कोकणात
केवळ १६ बस शिल्लक असल्याने लांब पल्ल्याच्या फेऱ्या होणार रद्द
------------
सकाळ वृत्तसेवा
येवला, ता.१० : गणेशभक्तांची गैरसोय टाळण्यासह उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी कोकण गणेशोत्सवासाठी येथील आगारातून ४० पैकी २४ बस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्या गुरुवारी कोकणकडे रवाना झाल्या.
परिवहन महामंडळाने जिल्ह्यातून ३६५ बस मुंबईकडे पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांना सुरक्षित आणि सोईस्कर प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे. गणेशोत्सवाच्या काळात कोकणातील विविध भागांत मोठ्या संख्येने चाकरमानी जातात. प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन आगाराने नियोजन केले आहे. कोकणातील विशेष वाहतुकीसाठी आगारातील २४ बस पाठविण्यात येत असल्याने पुढील काही दिवस नियमित वाहतुकीच्या वेळापत्रकात काही प्रमाणात बदल होणार आहे. या काळात शालेय फेऱ्या सुरळीतपणे सुरू राहणार आहेत. विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी आवश्यक नियोजन करण्यात आले आहे अशी माहिती आगारप्रमुख किरण धनवटे यांनी दिली आहे. येथील आगारातून सुटणाऱ्या काही लांब पल्ल्याच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. येवला - नाशिक मार्गावर धावणाऱ्या काही फेऱ्या रद्द करण्यात येणार आहे. नाशिक, शेगाव यासारख्या लांब पल्ल्याच्या काही फेऱ्या तसेच येवला- नाशिक मार्गावरील काही फेऱ्या तात्पुरत्या रद्द करण्यात येणार आहेत. प्रवाशांनी याची नोंद घेऊन प्रवासाचे नियोजन करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
------------
कोट
कोकणात बस पाठवताना ग्रामीण भागातील कोणत्याही फेऱ्या प्रभावित करण्यात आल्या नाहीत. सर्व फेऱ्या व्यवस्थित सुरू राहणार आहे. पुढील काही दिवस केवळ लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहे.
- किरण धनवटे,आगार व्यवस्थापक,येवला.
---------------