फोटोत हरण ठळक दिसतील असा फोटो घ्यावा.
ॲंकर
जंगली पशुंकडून पिकांचे नुकसान
--------------------------
हरणे, नीलगाय,रानडुकरांचा उच्छाद
सकाळ वृत्तसेवा
झोडगे, ता. २५ : पळसदरे व गुगळवाड शिवारात हरणे, नीलगाय आणि रानडुकरांच्या वाढत्या वावरामुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून शेतकरी हतबल झाले आहेत. वन्य प्राण्यांच्या बंदोबस्तासह संरक्षणात्मक उपाययोजना तातडीने राबवाव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
पळसदरे व गुगळवाड शिवाराला लगत वनक्षेत्र असून परिसरातील कुळथे व लुटे धरणांमध्ये मोठा जलसाठा आहे. त्यामुळे या भागात हरणे, नीलगाय आणि रानडुकरांचा वावर मोठ्या प्रमाणावर असतो. या वन्य प्राण्यांच्या कळपांकडून शेतातील पिकांची सातत्याने नासधूस होत आहे. त्यांना हुसकावून लावण्यासाठी शेतकरी विविध उपाय करत असले, तरी त्याचा फारसा उपयोग होत नसल्याचे चित्र आहे. शिवारातील पाळीव कुत्र्यांनाही हे वन्य प्राणी जुमानत नसल्याचे शेतकरी सांगतात.
महागडे बियाणे, रासायनिक खते, मशागत व इतर शेतीकामांवर मोठा खर्च करून उभे केलेले पीक वन्य प्राण्यांच्या उच्छादामुळे डोळ्यादेखत उद्ध्वस्त होत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यामुळे वन विभाग आणि कृषी विभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.
वन्य प्राण्यांचा बंदोबस्त न झाल्यास शेतकऱ्यांना उभी पिके गमवावी लागतील, अशी भीती व्यक्त होत आहे. वन्य प्राण्यांमुळे प्रभावित शेती क्षेत्राला जाळीदार कुंपण उभारण्यासाठी आर्थिक मदत द्यावी. तसेच प्रत्येक शेतकऱ्याला वन्य प्राणी परावृत्त करण्यासाठी झटका यंत्र उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी शामराव चव्हाण, भिकनराव देशमुख, नितीन निकम, मधुकर तुंवर यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे.
गुगुळवाड : शिवारात पिकांत हरणांचा मुक्त संचार