नाशिक : नाशिकमध्ये पहिल्यांदाच झालेल्या राष्ट्रीय युवा महोत्सवातून २० कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे.
देशभरातून नाशिकमध्ये आलेल्या आठ हजार युवक- युवतींनी नाशिकच्या काळाराम मंदिरासह त्र्यंबकेश्वर व शिर्डी दर्शनास पसंती दिल्याने ही उलाढाल झाली. (turnover of 20 crores from Yuva Mahotsav Nashik Trimbakeshwar Shirdi preferred by youth from all over country nashik)
युवा महोत्सवाचा शासकीय खर्च ६० कोटी रुपये होता. यातून चार दिवस पाच ठिकाणी होणाऱ्या स्पर्धांची व्यवस्था करण्यात आली. ३२ राज्यांतून आलेल्या आठ हजार युवक- युवतींच्या रोजच्या जेवणासह राहण्याची व्यवस्था हॉटेलमध्ये करण्यात आली.
त्यासाठी १२८ हॉटेल्स बुक करण्यात आल्या होत्या. या हॉटेल्सचा व बसचा खर्च शासनाने केला. पण त्याव्यतिरिक्त या युवकांनी नाशिकच्या पर्यटनाचा आनंद घेतला. त्यातून ही २० कोटींची उलाढाल झाली.
यात एका युवक- युवतीने साधारणतः दोन हजार रुपयांचा खर्च केला तरी दीड कोटी रुपयांची खरेदी झाली. मंदिर परिसरातून फुलांची, पूजेचे साहित्य खरेदी केले. पर्यटनासाठी रिक्षा व खासगी वाहनांतून प्रवास केला. त्यामुळे स्थानिक वाहनधारकांना यातून दोन पैसे मिळाले.
युवा महोत्सवाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार म्हटल्यावर प्रशासन झपाटून कामाला लागले. पंचवटी परिसरातील रस्ते गुळगुळीत झाले. दुभाजकांना रंगरंगोटी करण्यात आली. संपूर्ण शहर सुशोभित करून आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली.
महापालिकेने यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला. वेळ कमी असल्यामुळे झटपट कामे करावी लागली. भव्य मंडप, ५० हजार खुर्च्या, शहरभर लावण्यात आलेले फलक यातून स्थानिकांना रोजगार उपलब्ध झाला.
जेवणाचे कंत्राट लालूजी ॲण्ड सन्स यांना कंत्राट दिले होते. तर दीपाली डिझाईनने जर्मन तंत्रज्ञानाचा मंडप उभारला होता. यातील संपूर्ण साउंड सिस्टिम ही नाशिकची होती.
युवा महोत्सवाच्या निमित्ताने नाशिकमध्ये ६० कोटी रुपये शासनाचे तर इतर आनुषंगिक खर्च सुमारे २० कोटी रुपये झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. शहराच्या ब्रॅण्डींगसाठी हा खर्च उपयोगी ठरल्याचे बोलले जात आहे.
असा झाला खर्च
युवा महोत्सवासाठी क्रीडा विभागाचे ५० कोटींचे व केंद्र सरकारचे १० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या संपूर्ण खर्च युवा महोत्सवाच्या नियोजनासाठी वापरला जातो.
मात्र, पंतप्रधान मोदी यांच्या नाशिक दौऱ्याच्या निमित्ताने महापालिका व इतर विभागांनी केलेला खर्च यात अंतर्भूत नाही. तसेच युवकांनी केलेली खरेदी, पर्यटनाचा आनंद, प्रवास असा एकूण २० कोटी रुपये खर्च झाल्याचा अंदाज वर्तवला जातो.
रिक्षाचालकांविषयी तक्रारी
परराज्यातून आलेल्या युवक-युवतींना स्पर्धा असलेल्या ठिकाणांची माहिती नसल्यामुळे या ठिकाणी पोचण्यासाठी रिक्षाचालकांनी त्यांच्याकडून जास्त भाडे आकारल्याचे या युवकांनी सांगितले. शहरातील धार्मिक स्थळांना भेटीसाठीही अनेकांनी रिक्षाचा अनुभव घेतला.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.